गेल्या महिनाभरापुर्वी राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. गट – तटांतील पारंपारिक लढतींनी गावोगाव राजकीय घमासान रंगले. नगर – पा...
गेल्या महिनाभरापुर्वी राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. गट – तटांतील पारंपारिक लढतींनी गावोगाव राजकीय घमासान रंगले. नगर – पारनेरचे आमदार नीलेश लंके आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. काही अंशी ते यशस्वी झाले. तरीही अनेक गावातील तरुणांनी मोजक्या गाव पुढार्यांचे ‘मिलीभगत’ करून सत्तेचे आणि पदांचे वाटप करण्याचे ‘षडयंत्र’ मोडीत काढले. लोकशाहीत गैर प्रकार टाळले जावेत म्हणून बिनविरोध निवडणूक होणे अपेक्षित असले तरी त्या आडून मोजकी मंडळी गावाला वेठीस धरू पाहत होती. राजकीय पुढाऱ्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळात काय दिवे लावले आणि पुढच्या काळाचे व्हिजन जनतेसमोर मांडण्याचा निवडणूक हे माध्यम आहे. निवडणुकीत उमेदवार निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. उमेदवारांचे योग्य मूल्यमापन करून निवड प्रक्रिया पार पडते. पण, केवळ मोजक्या पुढाऱ्यांनी एकत्र येऊन जागा वाटप केलेले अनेक तरुणांना पटले नाही, ही लोकशाहीची गळचेपी असल्याची भूमिका त्यांनी घेतली. बिनविरोध ला विरोध करत निवडणुका घेण्याचा आग्रह धरला.
गटांतर्गत वाद टाळणे, आणि निवडणूक खर्चावरील बचत हा प्रामुख्याने पुढे येणारा मुद्दा होता. पण वाद काही फक्त ग्रामपंचायत निवडणुकीत होत नाही. मतदारांना विविध प्रलोभने दिली जातात, तीही नवी नाहीत. कोणताही मतदार उमेदवाराच्या घरी जाऊन माझ्यावर खर्च करा, किंवा खर्च केल्याशिवाय मतदान करणार नाही, अशी भूमिका घेताना अद्याप दिसलेला नाही. याउलट उमेदवारांचा ‘उत’ त्यांना नडतो, त्यांची प्रतिष्ठा आणि इर्षा आडवी येते, जिरवाजिरवीच्या नादात मतदारांची पळवापळवी केली जाते. मग खर्चही वाढतो. या स्वयंघोषित नेते मंडळीकडून साव असल्याचा आव आणला जातो. अन दोष मतदारांच्या माथी मारला जातो. उमदेवारांनी आपली भूमिका मतदारांपर्यंत योग्य पद्धतीने पोहच करावी, मैत्रीपूर्ण लढत करावी. निवडणुकीतील मतभेद, वैर आयुष्यभर बाळगू नये, असे काही मोजके बदल जर आपण करू शकलो तर सदृढ लोकशाहीला जन्म देऊ शकतो.
अविरोध निवडणुकांची जवळपास दोन दशकांची परंपरा असणारे हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी या गावातही यंदा निवडणुका झाल्या. तेथील बिनविरोध परंपरा खंडित होत आहे. या दोनही गावांनी राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक नेते दिले आहेत. सलग दोन तीन दशके याच नेते मंडळीचा शब्द प्रमाण मानला गेला. यातूनच या गावांत ‘एकाधिकारशाही’ वाढीस लागली. त्या विरोधात आव्हान देणारे तरुणांचे जथ्ये आपसूकच जन्माला आले.
ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम याबाबत असे म्हणतात की, मनमानी करणाऱ्यां नेत्यांनी ही धोक्याची घंटा ओळखली पाहिजे. निवडणुकांमुळे गावातील वातावरण बिघडते, हे खरे असले तरी केवळ बिनविरोध निवडणूक हा त्यावरील पर्याय नाही. घटनाकारांनाही अशा निवडणुका अपेक्षित नाहीत. त्यामुळे यापुढे जाऊन नियमानुसार, शांतता आणि खेळीमेळीतील निवडणुका असा नवा पायंडा पाडण्यासाठी आदर्श गावांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपण लोकशाहीचा पुरस्कार करताना कोणाच्या हक्कांना डावलू शकत नाही. बिनविरोध निवडणूक करताना सहमती झाल्याचे कितीही सांगितले जात असले तरी ती पूर्ण सहमती आणि खरी निवड असतेच असे नाही. मुळात हे ठरविताना ठरावीक गट आणि पुढाऱ्यांचा पुढाकार असतो. त्यातही सावली मानलेल्या नेतृत्वाचा निर्णय अंतिम मानला जातो. तो दरवेळी योग्य असेलच असेही नाही. त्यामुळे ही पद्धत चांगली असली तरी वर्षानुवर्षे ती वापरता येणार नाही. काळ बदलला आहे. नवी पिढी आली, ती अभ्यास करते, माहिती घेते. त्यातून त्यांचीही काही मते तयार झाली आहेत. त्यांनाही महत्वाकांक्षा आहेत. त्यांचा विचार व्हायला हवा. गावासाठी त्यांचेही योगदान विचारात घेतले पाहिजे. डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होता कामा नये. हा विचार गावातील जाणत्या मंडळींनी करण्याची गरज आहे. निवडणुका होणार असल्या तरी त्याचा गावाच्या वाटचालीत अडथळा येता कामा नये. आतापर्यंत जे झाले, त्याला गालबोट लागता कामा नये. सत्तेवर कोणीही येवो गावाचा लौकिक टिकवून ठेवणे गरजेचे आहे. सावलीखाली दुसरी झाडे उगवत नाहीत, असे म्हणतात. अशा नव्या झाडांनी बंड केले तरी वर्षानुवर्षे गावाची सावली बनून राहिल्यांना दूर सारता कामा नये. त्यांचा आधार घेऊनच नव्या विचाराने पुढील वाटचाल करण्यात शहाणपण आहे. अन्यथा याच निवडणुका पुन्हा पाच वर्षांनी येणार आहेत, याचे भान ठेवले पाहिजे’.
दरम्यान नवोदित पत्रकार तेजस शेलार यांनीही एक प्रतिक्रिया दिली आहे, त्यांच्या मते जे नेते यात पुढाकार घेतात, आणि स्वतःला मिरवून घेतात. आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी धडपड करतात. त्यांनीही आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी करणार नसल्याचे जाहीर करावे. नव्या उमेदवारांना संधी द्यावी. मात्र,असे न करता ते स्वतःच हीत साधू पहात असतीलच तर जनतेसमोर उघडे पडतील.
तरुणाई नेहमीच बदलाचा भाग बनत असते. परिवर्तनाची त्यांना आस असते. जुन्या खोडांना हे कदापि सहन होत नाही. ते दबाव तंत्राचा वापर करू पाहतात. मात्र, त्यांचे हे शस्र उलटे पडत आहे. तरुण कार्यकर्ते, युवक हा दबाव झुगारून लोकशाहीच्या या महाकुंभात सामील होत आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. या घुसळणीतूनच नवनिर्माण होणार आहे. आपल्या गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर तरुण, युवकांसोबत ज्येष्ठांनी संवादातून समन्वय साधने आवश्यक आहे. हा समन्वयाचा ‘धागा’ निर्माण होण्याची गरज आहे. याच धाग्याने सर्वांची गुंफण होणे आवश्यक आहे. निवडणुकांत आपण हे साध्य करू शकलो तर आपले मुलभूत, स्थानिक प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागतील, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नसावी.
श्री. महादेव गवळी
लेखक हे राज्यकर्ताचे संपादक आहेत.
COMMENTS