अहमदनगर : सध्या लग्नसराईचा काळ आहे. गावोगाव लग्नांची धामधूम जोरात आहे. समाजात मुलींची संख्या घटलेली आहे. त्यामुळे वधूंची शोधाशोध करण्यासाठ...
अहमदनगर :
सध्या लग्नसराईचा काळ आहे. गावोगाव लग्नांची धामधूम जोरात आहे. समाजात मुलींची संख्या घटलेली आहे. त्यामुळे वधूंची शोधाशोध करण्यासाठी वरपक्षाची कसरत होत आहे. एका बाजूला विवाहासाठी मुलींना मागणी वाढलेली आहे. तर दुसरीकडे मुलांना नोकरी, शेती, घरदार आदींमुळे लग्नाच्या या बाजारात जरासे वाईट दिवस आहेत. या सामाजिक बाबी हेरून वरपक्षाची फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या राज्यासह देशात सक्रीय आहेत. लग्नाचे नाटक करून फसवणूक करणाऱ्या अशाच एका टोळीला कर्जत पोलिसांनी गजाआड केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील एका मोठ्या गावातील युवकासोबत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. परभणी येथील टोळीने या युवकाशी मुलीचे लग्न जमवण्यासाठी भेट घेतली. त्यानुसार सर्व सोपस्कार पार पडून लग्न जमवले. या लग्नासाठी या टोळीने नवऱ्या मुलांकडून दोन लाख दहा हजार रुपये घेतले. लग्न उरकण्यात आले. काही दिवसात नवरी मुलीने पोबारा केला. यावेळी यातील नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना याची कल्पना दिल्याने पोलिस निरीक्षक यादव यांनी आपल्या कौशल्याने एक पथक नियुक्त करून परभणी येथे जाऊन त्या टोळीतील दोन जणांना ताब्यात घेतले. या टोळीकडून साठ हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुलींचे यापूर्वी झाले तीन लग्न !
परभणी येथून या टोळीला अटक करण्यात आली आहे. यातील नवरी मुलीचे यापूर्वी अशाच पद्धतीने तीनवेळा लग्न लावण्यात आल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. यापूर्वीही अनेक कुटुंबांची फसवणूक या टोळीने केली आहे. कर्जत पोलिस ठाण्यात या टोळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांचे कौतुक !
ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई भगवान शिरसाठ, पोलिस जवान मारुती काळे, तुळशीदास सातपुते, सागर म्हेत्रे, भाऊ काळे, गणेश भागडे, गणेश ठोंबरे, संपत शिंदे यांनी केली. पोलिसांचे या कारवाईबद्दल तालुकाभर कौतुक होत आहे.
COMMENTS