कोलकत्ता : सध्या पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांत विधानसभांच्या निवडणुका आहेत. भाजपाने या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पश...
कोलकत्ता : सध्या पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांत विधानसभांच्या निवडणुका आहेत. भाजपाने या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकप्रचारासाठी भाजपाने रविवारी (२१ मार्च) जाहीरनामा जारी केला. गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राज्यात भाजपला सत्ता मिळाली तर, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करू, असे आश्वासन या जाहीरनाम्यात दिले आहे. दुसऱ्या बाजूला आसाममध्ये सीएए कायद्याला जोरदार विरोध झाला होता. भाजपच्या विरोधात या मुद्द्यावरून आसाममध्ये प्रचंड नाराजी दिसून येत असल्याने विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीएए लागू करण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी निवडणूक होत आहे. आठ टप्प्यांत मतदान होणार असून पहिल्या टप्प्याचे मतदान २७ मार्चला होणार आहे. निवडणुकीच्या वातावरणामुळे तणाव निर्माण झाला आहे. हिंसाचाराची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे.
२०१६ मध्ये कॉंग्रेसला प्रथमच पराभूत करून आसाममध्ये भाजपाला सत्ता मिळाली आहे. ही सत्ता टिकवण्यासाठी भाजपा जोरदार प्रचारही करीत आहे. कॉंग्रेसने आसाममध्ये प्रथमच बदरुद्दीन अजमल यांच्या (AIUDF) एआययूडीएफ, लहान प्रादेशिक संघटना असणारी एजीएम आणि कट्टर प्रतिस्पर्धी तीन डाव्या पक्षांशी युती केली. दुसरीकडे, एजेपी पक्षानेही प्रादेशिक आघाडी केली आहे, त्यामुळे निवडणुक त्रिशंकू झाली आहे.
सन २०१९ मध्ये भाजपप्रणित सरकारने लोकसभेमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याचा ठराव पारीत केला आहे. त्यावरून देशभरात मोठं वादळ झालं होते. देशात विविध ठिकाणी देशव्यापी आंदोलने, मोर्चे झाले. या कायद्याला आसाम, पश्चिम बंगाल आणि राज्यांतून तीव्र विरोध करण्यात आला होता.
आसाम व पश्चिम बंगाल येथे एकाच वेळी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाने दुट्टपी भूमिका घेतली असल्याने याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
COMMENTS