दिवसेंदिवस बालविवाहांचे प्रमाण वाढत असून मागील वर्षभरात लॉकडाऊन काळातही मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने बालविवाह झाल्याचे समोर आले आहे. या...
दिवसेंदिवस बालविवाहांचे प्रमाण वाढत असून मागील वर्षभरात लॉकडाऊन काळातही मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने बालविवाह झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून बालविवाह निर्मूलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आता प्रिंटिंग प्रेस, केटरर्स, विधिवत लग्न लावणारे विविध धर्मांचे धर्मगुरू, पुरोहित यांनी जन्माचा दाखला वधू आणि वरपक्षाकडून घ्यावा. मुलाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असल्याशिवाय यापैकी कुणीही त्यांना सेवा देऊ नये, अशा स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. याचे जो कुणी उल्लंघन करेल त्याच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा-२००६ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने ३१ बालविवाह रोखल्याचा दावा केला आहे. असे असले तरी ज्या प्रमाणात बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत तेवढे ते होत नाहीत. यासाठी आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना सहायक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. यासाठी युनिसेफ आणि सक्षम संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली. या टास्क फोर्सच्या माध्यमातून ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी शिक्षकांचीही मदत घ्यायची आहे.
समुपदेशनावर भर देणार
लॉकडाऊनच्या काळातही बालविवाह छुप्या पद्धतीने झाले आहेत. ३१ बालविवाह रोखण्यात आले होते. ते रोखण्यासाठीची मोहीम अधिक प्रभावी व्हावी म्हणून ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सामाजिक, आरोग्यविषयक व इतर असे अनेक परिणाम बालविवाहामुळे होतात याबाबत जाणीव-जागृती केली जाईल.
प्रसाद मिरकले, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद
बालविवाह रोखण्यासाठी असे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर खटला चालवण्यासाठी साक्षी- पुरावा गोळा करणे
बालविवाहात सहभागी होऊ नये यासाठी समुपदेशन करणे
बालविवाहातून निर्माण होणाऱ्या आरोग्य आणि सामाजिक अनिष्ट गोष्टींबाबत जाणीव-जागृती निर्माण करणे
COMMENTS