मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी त्यांच्या पोटा...
मुंबई :
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखल्यामुळे थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची तपासणी करण्यात आली. पुढील उपचारासाठी आणखी काही दिवस पवारांचा मुक्काम हॉस्पिटलमध्ये असणार आहे. तर योग्य तपासण्या आणि चाचणी केल्यानंतर त्यांच्यावर छोटेखानी सर्जरी करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा चाहता वर्ग मोठा आहे. देशात आणि राज्यांत त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. पवारांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे वृत्त बाहेर येताच, पवार समर्थकांनी सोशल मिडीयावर प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभकामना आणि सदिच्छा व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनीही पवारांना सदिच्छा देतानाच, ‘योद्धा लवकरच पुन्हा सक्रीय होईल’ या मथळ्याखाली एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट जोरदार व्हायरल झाली आहे. त्यावरही अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्यात. शरद पवार या आजारातून लवकरच बरे व्हावेत, यासाठी अनेक नेते, कार्यकर्ते सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची व्हायरल पोस्ट जशीच्या तशी
संसदेच्या अधिवेशनासाठी शरद पवार रवाना झाले, पण दिल्लीच्या आधी झारखंडला गेले. स्थानिक आमदारांनी आयोजित केलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले.
संसदेचे अधिवेशन सुरू असताना मधे दोन दिवसांची सुट्टी आली तर या काळात आग्रा, फत्तेपूरसिक्रीचा कौटुंबिक दौरा केला. सतत राजकीय, सामाजिक कामात व्यस्त असलेले पवार कौटुंबिक सहलीवर असतानाच इकडं मुंबईत मोठं नाट्य घडलं. परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी टार्गेटचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र ओळखून पवार स्वतः मैदानात उतरले. सलग दोन दिवस दिल्लीत पत्रकार परिषदा घेतल्या. सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. अशा प्रसंगी एखाद्या प्रश्नावर चिडचिड स्वाभाविक असते, पण ज्यांचा नेता सहा वर्षात एकाही पत्रकार परिषदेला सामोरा गेला नाही, ती मंडळी यावरून बोलताहेत हे आश्चर्य!
संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर राजस्थानात नरेंद्र वर्मा यांनी उभारलेल्या शाळेच्या उदघाटन समारंभासाठी गेले. (तिथून परतताना ते गुजरातमध्ये अमित शहा यांना भेटल्याची बातमी भाजपकडून पेरण्यात आली.) मुंबईत दोन दिवस थांबून ते पुन्हा पाच दिवस पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या प्रचारासाठी जाणार होते. ऐंशी वर्षाचा हा योद्धा रणरणत्या उन्हाळ्यात किती अखंडपणे भ्रमंती करीत होता हेच यावरून दिसते.
पण अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांच्या भ्रमंतीला तूर्तास ब्रेक लागला आहे. त्यांचे सगळे कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. पोटात दुखू लागल्यामुळे तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर त्यांच्या पित्ताशयामध्ये एक समस्या असल्याचे आढळून आले. सध्या ते रक्त पातळ होण्याची औषधे घेत होते, ती या समस्येमुळे थांबवण्यात आली आहेत.
३१ मार्चला त्यांना रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया केली जाईल. पुढील सूचना येईपर्यंत त्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
काळजीचे काही कारण नाही. शरद पवार यांची प्रकृती आणि प्रवृत्ती पाहता ते लवकर बरे होऊन पुन्हा कामाला लागतील. कारण आजसुद्धा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांना, शेतकऱ्यांना, पुरोगामी चळवळीतल्या सगळ्या घटकांना त्यांचाच आधार वाटतो. आणि सामान्यांचा हा विश्वासच शरद पवार यांना बळ पुरवत असतो.
COMMENTS