अहमदनगर : सध्या राज्यात घडणाऱ्या वेगवान घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नेते मंडळी वारंव...
अहमदनगर :
सध्या राज्यात घडणाऱ्या वेगवान घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नेते मंडळी वारंवार पत्रकार परिषदांच्या माध्यामातून टीका टिप्पणी करण्यावर भर देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस कडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात येत नव्हती. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी विरोधकांना चांगलेच शिंगावर घेतले. थोरातांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
शहर जिल्हा काँग्रेची संघटनात्मक आढावा बैठक ना. थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ‘मंत्रिपदासाठी ज्यांनी कॉंग्रेस सोडली आज त्यांच्यावर पायरीवर उभा राहायची वेळ आली आहे. कॉंग्रेससोबत सत्तेत होतो आणि कठीण काळात कॉंग्रेस सोडून जाणे हा आमचा पिंड नाही. पक्षाशी निष्ठा ठेवल्यानेच आज मंत्रिपद मिळाले आहे. त्यांचे डावपेच त्यांच्या अंगलट आले आहेत.’
विरोधक सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न फसला आहे. विरोधक तोंडघशी पडले आहेत. शिवसेना राष्ट्रवादी व कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. सध्या तरी कोणताही धोका नाही, होणारही नाही, असा विश्वास ना. थोरातांनी व्यक्त केला.
COMMENTS