अहमदनगर : निंबळक येथील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अर्थात सेतू उपकेंद्र गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे....
अहमदनगर :
निंबळक येथील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अर्थात सेतू उपकेंद्र गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी अनेक महत्वाचे दाखले ‘या’ केद्रातून मिळत नाहीत. यामुळे करोना कालावधीत शैक्षणिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सेतुकेंद्र तातडीने खुले करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे दिले होते. मात्र, मुदत देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही करण्याची जबाबदारी टाळली आहे. याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी केंद्राचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत याचा जाबही विचारला आहे.
नुकतीच निंबळक ग्रामपंचायत निवडणूक झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार घेताच कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या कामाची निविदा प्रक्रिया झालेली नाही. तसेच उर्वरित सदस्यांना याबाबत कोणतीही माहिती अथवा कल्पना दिलेली नाही. अशा मासिक सभा किंवा ग्रामसभेची परवानगी न घेता नियमबाह्य पद्धतीने हे काम केले जात आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. तसेच नियमबाह्य पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात आली आहे, असे आरोप करत ग्रामस्थांनी या गैरप्रकाराकडे लक्ष वेधण्याचे पत्र तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दिली आहे.
ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोतकर, अर्जुन कोतकर, श्रीमती शहाबाई रोहोकले, राणी दिवटे, मोहिनी कोतकर, ज्येष्ठ नेते मुरलीधर कोतकर आदींनी याबाबत निवेदन दिले होते. सनदशीर मार्गाने लढा देऊनही कोणतीही कार्यवाही होताना दिसत नसल्याने सदस्यांसह ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
या निवेदनावर निंबळक ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी खुलासा केला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘सेतू सेवा केंद्र सरपंचांनी त्यांचा अधिकार वापरून बंद केले आहे. आतापर्यंत जे काम चालू आहे, त्याचे बील अद्याप अदा केले नाही. कोणत्याही प्रकारची कर्मचारी भरती करण्यात आली नाही’.
या पत्रावर सरपंच प्रियांका लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर आणि ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे यांच्या सह्या आहेत. आंदोलकांना असा जबाबदारी घेणारा ‘खुलासापत्र’ प्राप्त झाल्याने ते आणखी संतप्त झाले आहेत. या पत्राची प्रत गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवून संबधित बेजाबदार पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे, असे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोतकर यांनी म्हटले आहे.
सरपंचांना ‘हा’ विशेषाधिकार कोणी दिला?
सेवा केंद्र सुरु करण्याबाबत दिलेल्या निवेदनावर खुलासा करताना, सरपंच यांनी त्यांच्या अधिकाराखाली केंद्राला कुलूप लावले असे, बेजबाबदारपणे म्हटले आहे. असा कोणता विशेषाधिकार निंबळकच्या सरपंचांना प्राप्त झाला आहे, तो कोणी दिला, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालावे, संबधित बेजाबदार पदाधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र कोतकर (सदस्य, ग्रामपंचायत निंबळक) यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे
सेवा केंद्र मनमानी पद्धतीने बंद केल्याने विद्यार्थ्यांची दाखले मिळवण्यासाठी अडवणूक होत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका संभावत आहे. शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक दाखले देणेही मुश्कील झाले आहे. सरपंचानी कुलूप लावून चाव्या ताब्यात घेतल्या आहेत. तातडीने मार्ग काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी रोहिणी राख (संगणक परिचालिका) यांनी केली आहे.
COMMENTS