भोपाळ : मागील चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून दिल्ली शहराच्या भोवताली सीमेवर देशभरातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्...
भोपाळ :
मागील चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून दिल्ली शहराच्या भोवताली सीमेवर देशभरातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन चालू ठेवले आहे. मात्र, सरकार असे कायदे मागे घेण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्याचवेळी मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथील पती-पत्नी यांनी मोदीजींच्या विरोधात हाय कोर्टात धाव घेतली आहे.
जबलपूर येथील रहिवासी स्टेनली जॉन लुईस आणि त्यांची पत्नी शशी स्टेला लुईस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भारतीय गरीब पार्टीच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्टॅन्ली आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष शशी स्टेला लुईस यांनी या तीन शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. तसेच या आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकर्यांच्या कुटूंबाला एक कोटी रुपयांची मदत देण्यात यावी. शहीद किसान स्मारकही बांधले जावे. याचिका दाखल करणार्या दाम्पत्याला उच्चस्तरीय संरक्षणाची मागणीही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या याचिकेच्या सुनावणीदरम्यान स्टेनली हेच कोर्टात बाजू मांडणार आहेत. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणे अपेक्षित आहे. यापूर्वीही स्टेनली अशा याचिका दाखल करण्यासाठी ओळखले जातात. विशेष म्हणजे नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ सुरू असलेले शेतकरी आंदोलन चालूच आहे. शेतकरी आंदोलनाला तब्बल 4 महिने झाले आहेत. या चळवळीत शेकडो शेतकऱ्यांनी बलिदानदेखील दिले आहे. यापूर्वी भारतीय गरीब पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्टॅन्ली जॉन लुईस यांनी मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये देण्याचे आव्हान केले होते, असेही हरीभूमी या राष्ट्रीय वृत्तपत्राने बातमीत म्हटलेले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
COMMENTS