विशेष लेख सध्या विमा (insurance) कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी (agent) यांचा बाजारात सुळसुळाट झालेला दिसून येतो. आमच्याच सेवा कशा चांगल्या ...
विशेष लेख
सध्या विमा (insurance) कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी (agent) यांचा बाजारात सुळसुळाट झालेला दिसून येतो. आमच्याच सेवा कशा चांगल्या असून आम्हीच सर्वाधिक परतावा देतो, शिवाय सुरक्षित गुंतवणूक (investment) असल्याचे दावे अशा सर्रास विमा कंपन्याकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात परतावा देण्याची वेळ आली की, कंपन्या * या अगदी डोळ्यांना स्पष्ट न दिसणाऱ्या चिन्हाच्या आड दडून बसतात. विमा धारकाला परतावा अर्थात ‘क्लेम’ मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात. अशा प्रकारची आपली फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही, याची आपण सजग नागरिक, ग्राहक म्हणून दक्षता घेणे आवश्यक आहे.
आपल्याला कुठलाही त्रास न होता दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळवायची असल्यास पॉलिसी (policy) विकत घेताना आणि दाव्याचा अर्ज भरताना पॉलिसी धारकांनी काही घटकांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव पण असावी म्हणजे त्यांना त्यांचा हक्क मिळतो आहे ह्याची खात्री करता येते. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने याबाबत अत्यंत कडक नियमावली दिली आहे. ग्राहकांची विमा कंपन्या फसवणूक करणार नाहीत, याकडे त्यांचे विशेष लक्ष असते.
आयुर्विमा
सर्व साधारणपणे आयुर्विमा पॉलिसी (life insurance policy ) विकत घेताना फॉर्म भरण्याचे काम एजेंटवर सोडू नका. विमा कंपन्यांचे प्रतिनिधी योग्य माहिती भरतीलच याची निश्चित खात्री नाही. किंवा ते काही रकाने रिकामे ठेवू शकतात. आपण सद्यस्थितीतील सर्वच बाबींची माहिती विमा कंपनीला योग्य पद्धतीने देणे आवश्यक आहे. विशेषत्वाने वैद्यकीय परिस्थितीची चुकीची माहिती दिल्यामुळे किंवा अपुरी माहिती दिल्याने तुमचा दावा नाकारण्यात येऊ शकतो. त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्यावी.
विम्याचा दावा (claim) करताना कोणत्याही अधिकाऱ्याला लाच वा प्रलोभन देऊ नका, किंवा अधिकारी जरी पैसे मागत असतील तरी देऊ नका. कोणताही दावा प्रक्रिया लवकर करण्यासाठी किंवा दावा मान्य करण्यासाठी अधिकाऱ्याला बळजबरी करू नका.
दावा मान्य करण्यासाठी दाव्याची कागदपत्रे वेळेत आणि व्यवस्थित सादर कारणे आवश्यक असते. विमा कंपनीच्या संकेत स्थळावर दाव्यासाठी लागणार्या सर्व कागदपत्रांची यादी असते. म्हणून दावा करताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडूनच सादर करावा म्हणजे दावा प्रक्रिया जलद होते.
दावा प्रक्रियेस विलंब केल्यास आयआरडीएकडे (IRDA) तक्रार दाखल करता येते. विहित मुदतीत दावा मान्य करून परतावा न दिल्यास जितका विलंब झाला असेल त्या दिवसांच्या व्याजासकट रक्कम देणे विमा कंपनीला बंधनकारक असते. त्यामुळे पॉलिसी घेताना बारीकसारीक बाबी विचारात घ्याव्यात. शक्यतो, विमा क्षेत्रातील तज्ञ आणि सल्लागार यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेणे लाभदायक ठरते.
संपादन : महादेव गवळी
COMMENTS