अहमदनगर : स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राने औद्योगिक, कृषी क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली. त्याचाच परिणाम येथील सामान्य माणसाच्या जीवनमा...
अहमदनगर :
स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राने औद्योगिक, कृषी क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली. त्याचाच परिणाम येथील सामान्य माणसाच्या जीवनमानावर होत गेला. आजही देशात आपल्या राज्याची बरोबरी करणारे दुसरे राज्य नाही. महाराष्ट्राला दूरदृष्टीचे लाभलेले नेते आणि त्यांनी सर्वस्व त्यागून राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. त्यामुळेच देशाची राजधानी दिल्ली असली तरी आर्थिक राजधानी म्हणून ‘मुंबई’ची ओळख आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार आणि मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या लोकनेत्यांची आपण माहिती घेऊ. आजच्या भागात आपण यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानाबद्दल माहिती घेऊयात.
संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा पहिला मान मिळाला तो यशवंतराव चव्हाण यांना. त्यांचा शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व आदी मुद्यांवर त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. शेती विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. शेती विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यात आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे, यासाठी यशवंतराव आग्रही होते. ‘शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, त्याचे उपयोजन करत व्यावसायिक शेतीला प्राधान्य दिले तरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल’, असे मत त्यांनी मांडले.
यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा, यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात.
पत्रकार, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल अनेक महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांबद्दलही त्यांनी विपुल लेखन केले आहे. ते म्हणतात, ‘यशवंतराव यांच्या मृत्यूपश्चात अधिकाऱ्यांनी त्यांचे सामान हलवले. त्यांचे पासबुक सापडले. त्यांच्या हयातीत त्यांनी मागे ठेवलेली रक्कम फक्त छत्तीस हजार रुपये एवढीच होती. त्यांनी त्यांच्या मागे संपत्ती ठेवली नाही. पण एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा स्वत:च्या बुद्धीच्या, कर्तृत्वाच्या बळावर लोकमान्यांच्या नंतरचा महान नेता बनला हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही”
संपादन व संकलन : महादेव गवळी
COMMENTS