कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसींच्या मुद्द्यावर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गां...
कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी |
नवी दिल्ली :
कोरोना प्रतिबंधक लसींच्या मुद्द्यावर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना लसींबाबत केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर मोदी सरकारचे मंत्री चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ‘जुलै आला, तरी लस आली नाही,’ असे ट्विट करत केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली होती. मात्र त्यांचे हे ट्विट काही मंत्र्यांना रुचले नाही. मग, त्यांनीही तितक्याच जोरदारपणे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की ‘मी कालच जुलै महिन्यात किती लसी उपलब्ध होतील याची माहिती दिली आहे. मग, राहुल गांधी यांना नेमकी काय समस्या आहे, त्यांना समजत नाही का, अहंकार आणि अज्ञानाच्या व्हायरससाठी कोणतीही लस नाही. काँग्रेसला आपल्या नेतृत्वात बदल करण्याबाबत विचार करण्याची गरज आहे.’
तर दुसरीकडे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘कोरोना लसींचे 12 कोटी डोस जुलै महिन्यात उपलब्ध होणार आहेत. जे खासगी दवाखान्यांच्या पुरवठ्यापेक्षा वेगळे आहेत. राज्यांना 15 दिवस आधीच याबाबत माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांना समजले पाहिजे की कोरोना विरूद्धच्या संघर्षात राजकारण करणे योग्य नाही.’
दरम्यान, कोरोना काळात लसींच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेला वाद अजूनही मिटलेला नाही. लसी वेळेवर मिळत नसल्याची तक्रार राज्ये करत असली तरी केंद्र सरकार मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहे. आताही केंद्र सरकारने राज्यांकडे जवळपास 1.24 कोटींपेक्षा जास्त लसी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोना प्रतिबंधक लसींबाबत माहिती दिली. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 32.92 कोटी लसी दिल्या आहेत. यामध्ये वाया गेलेल्या लसींचाही समावेश आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे आजही लसीकरणासाठी 1.24 कोटीपेक्षा जास्त लसींचे डोस शिल्लक आहेत. तसेच पुढील तीन दिवसात राज्यांना 94 लाख 66 हजार 420 लसींचा पुरवठा होणार आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
आता 21 जूनपासून सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणास सुरुवात झाली आहे. यासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देत आहे. राज्यांनी लसीकरण सुरू केले असले तरी पुन्हा लसींच्या कमतरतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंजाब आणि छत्तीसगड राज्यांनी याबाबत केंद्र सरकारला माहिती देत पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे की राज्यात लसींची केमतरता असल्याचे केंद्र सरकार आजही मान्य करण्यास तयार नाही
COMMENTS