अहमदनगर : प्रतिनिधी रस्त्या लगतचे अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना देताना स्थानिक नागरिक. बोल्हे...
अहमदनगर : प्रतिनिधी
रस्त्या लगतचे अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना देताना स्थानिक नागरिक. |
बोल्हेगाव - गांधी नगर रस्त्याच्या लगत अनेक बाहुबली गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अनाधिकृत टपऱ्या उभारल्या आहेत. हे अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी महानगरपालिकेच्या आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी रहिवासी हिम्मतराव मुरकुटे, सागर मुळे, वामन मोहोळकर, दादाराम गारुडकर, अशोक भंडारी, देवदेवी यादव, रामाश्रय यादव, सहारा सय्यद, अनिसउद्दीन सय्यद, सिंधुताई सावंत, सुशीला फंड, अल्लाबक्ष पठाण, अण्णासाहेब नजन, पद्माबाई गावडे, बन्सी दरंदले, विलास कळमकर, नारायण झावरे, सुनिता राहिंज आदी उपस्थित होते.
आयुक्त गोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोल्हेगाव गांधी नगर रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून येथील स्थानिक राजकीय पाठबळ असलेले गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी गुंडागर्दी करून रात्री-अपरात्री वेगवेगळ्या अनधिकृत टपऱ्या टाकलेल्या आहेत तसेच बेकायदेशीर बांधकाम केलेले असून आम्हा सर्व प्लॉट धारकांना वहिवाटीचा रहदारीचा रस्ताच शिल्लक ठेवलेला नाही. तेथे त्यांचे अवैध धंदे चालू आहेत. तेथील वातावरण भीतीचे दहशतीचे व गुंडागर्दी चे झालेले असून सभ्य सुसंस्कृत समाजासाठी योग्य राहिलेले नाही. येथील नागरिकांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. अतिक्रमणधारकांमुळे अडचणी वाढल्या आहेत. अनधिकृत टपऱ्या काढून टाकण्यासाठी वेळोवेळी महापालिकेतील संबंधित सर्व विभागांना अर्ज विनंत्या व निरंतर पाठपुरावा करून देखील अद्याप कुठल्याही ठोस कारवाई झालेली नाही.
अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची दुट्टपी भूमिका; नागरिकांचा उपोषणाचा इशारा
अतिक्रमण विभाग मनपाचे अधिकारी कर्मचारी वरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी आले असता येथील राजकीय पाठबळ असलेले गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी त्यांची खाजगी जागा असल्याचे सांगून त्यांना कारवाई करून दिली नाही. अनधिकृत टपऱ्या काढून दिल्या नाहीत. अतिक्रमणाची कारवाईही ‘मॅनेज’ करण्यात आली की काय, असा सवाल उपस्थित केला आहे. अतिक्रमण विभागाकडे वहिवाटीचा रहदारीचा रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की, खाजगी जागा असल्याने टपऱ्या आम्ही काढू शकत नाही. म्हणजे हेच अधिकारी सदर जागा रोडची असल्याचे स्पष्टपणे लेखी नमूद करतात. तोंडी मात्र ती जागा खासगी असल्याचे सांगून टपर्याी काढण्यास स्पष्ट नकार देतात, ही दुटप्पी व संशयास्पद भूमिका आहेत. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यांवरही योग्य कारवाई करण्यात यावी. तसेच रस्त्यालगतची सर्व बेकायदेशीर अतिक्रमण केलेले टपऱ्या त्वरित काढण्यात यावे अन्यथा 10 ऑगस्ट रोजी सर्व प्लॉट धारक रहिवासी नागरिक मनपा कार्यालयासमोर सहकुटुंब अमरण उपोषण करतील. असा इशाराही देण्यात आला आहे.
COMMENTS