विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना देताना जन आधार सामजिक संघटनेचे अध्यक्ष प्र...
विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना देताना जन आधार सामजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे व इतर पदाधिकारी. |
अहमदनगर : प्रतिनिधी
प्रशासनातील आजवरचा सर्वात दुर्लक्षित आणि वंचित घटक म्हणजे अर्धवेळ स्त्री परिचारिका. या कोरोना महामारीत सरकारी आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी आरोग्य विभागात साफसफाई तसेच पडेल ती कामे करणारी हक्काची व्यक्ती म्हणजे अर्धवेळ परिचारिका. केवळ नावाने अर्धवेळ असणारी ही परिचारिका सुमारे 7 ते 8 तास रोज काम करते परंतु तिचा पगार हा मागील तीस वर्षांपूर्वी 50 रुपये महिना ते आज मात्र 3 हजार रुपये महिना एवढाच वाढलेला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने 100 रुपये आणि राज्य सरकारच्या वतीने, 2900 रुपये असे मानधन मिळते. या महागाईच्या काळात 100 रुपये रोजाने कुणी काम करणार दुसरं मिळणार नाही परंतु, आज ना उद्या या मायबाप सरकारला जाग येईल आणि आपला उद्धार होईल या धोरणाने ते आजपर्यंत रात्रंदिवस राब-राब,राबत,आहेत. कुठल्याही मोठ्या इमारतीच्या पायाचा प्रत्येक दगड जसा महत्वाचा असतो,त्याचप्रमाणे अर्धवेळ परिचारिका या शासकीय आरोग्य यंत्रणेत काम करत आहेत.त्यांची आजची अवस्था ही आई जेवू घालीना, आणि बाप भीक मागू देईना अशी झालेली आहे, व्यथा जन आधार संघटनेने दिलेल्या निवेदनात मांडण्यात आली आहे.
मागील वर्षीच्या कोरोना काळात देखील अनेक परिचर महिलांना प्रोत्साहन भत्ता,अद्याप ही मिळालेला नाही. परिचारिका आजही कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या परिचर महिलांना यावर्षीचा तसेच मागील वर्षीचाही, प्रोत्साहन भत्ता देण्याची उपाययोजना करावी, तसेच आपण किमान वेतनानूसार त्यांना लवकरात लवकर पगारवाढ करावी व यापुढील सर्व वेतन (मानधन)हे त्यांना ऑनलाइन पध्दतीने देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निदान आमचे प्रश्न मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री यांचेकडे तातडीने मांडावेत अशी कळकळीची मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर यांना निवेदन देऊन करण्यात आली.
सिंदखेड राजा,(जिल्हा बुलढाणा) येथील PTL पदावर काम करत असताना सर्प दंशाने मृत पावलेल्या गीता बुरकुल यांच्या मुलास शासनाकडून मदत मिळावी, अशीही मागणी परिचारिका महिला कर्मचार्यांनी केली आहे.
यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत राज्य सचिव अमित गांधी, जिल्हा सचिव बाळासाहेब केदारे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दीपक गुगळे, संतोष उदमले, कल्पनाताई महाडिक, सुरेखा जाधव, कुमुदिनी वंजारे, शहेजान शेख, लता कांबळे, उषा केदारे, प्रतिभा सोनवणे, नंदा शिंदे, योगेश सोनवणे, किरण जावळे, उमेश करपे आदीसह परिचारिक महिला उपस्थित होते.
मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन : पोटे
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य न झाल्यास ‘जन आधार सामाजिक संघटने’च्या वतीने येणाऱ्या 5 जुलैला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचे कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी दिला आहे.
COMMENTS