नवी दिल्ली : इस्रायली स्पायवेअर हेरगिरी प्रकरणावरून देशाच्या राजकारणात उठलेले वादळ अजूनही थांबलेले नाही. या प्रकरणी सरकारच्या धोरणाचा विर...
नवी दिल्ली :
इस्रायली स्पायवेअर हेरगिरी प्रकरणावरून देशाच्या राजकारणात उठलेले वादळ अजूनही थांबलेले नाही. या प्रकरणी सरकारच्या धोरणाचा विरोध करत विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून धरले आहे. तर दुसरीकडे सरकारनेही या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हा वाद अजूनही मिटलेला नाही. आताही काँग्रेस नेते आणि संसदेच्या आयटी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
या मुद्द्यावर 28 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली बैठक रोखण्याचा प्रयत्न भाजप सदस्यांनी केला. कारण, या हेरगिरीच्या प्रकरणी चर्चा व्हावी असे या सदस्यांना वाटत नव्हते. या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांना साक्ष द्यायची होती त्या अधिकाऱ्यांनी हजर राहू नये, असे निर्देश त्यांना दिले होते, असे वाटत असल्याचे थरूर यांनी सांगितले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या मुद्द्यावर जबाबदारी झटकण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न म्हणजे लोकशाही आणि सामन्य भारतीय नागरिकांची चेष्टा आहे, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली. हेरगिरीच्या या प्रकरणावर चर्चा न करणे, उत्तरे देण्यास टाळाटाळ करणे म्हणजे एक प्रकारे संसदेचा अपमान आहे, असेही थरूर यांनी सांगितले.
दरम्यान, याआधी काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले होते, की संसदेचे कामकाज तत्काळ सुरू होईल, अगदी पुढच्या मिनिटास कामकाज सुरू होऊ शकते. मात्र, यासाठी सरकारला एक छोटे काम करावे लागेल ते म्हणजे सरकारला दोन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. केंद्र सरकारने हे स्पायवेअर खरेदी केले आहे का? या स्पायवेअरचा वापर करून व्यक्तींची हेरगिरी केली आहे का, केली असेल तर त्या व्यक्तीची नावे सरकारने सांगावे, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, असे त्यांनी सांगितले. मात्र केंद्र सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तसेही सरकारने विरोधकांनी दिलेले इशारे, काही वेळेस त्यांनी केलेल्या सुच यांचा सरकारने कधीच विचार केलेला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे याकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे.
COMMENTS