मुंबई : कोरोना महामारीच्या काळात देशातील खासगी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. आता मात्र कोरोनाचा प्रसार ...
मुंबई : कोरोना महामारीच्या काळात देशातील खासगी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. आता मात्र कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत आहे तसे कंपन्याच्या परिस्थितीतही सुधारणा होत आहे. आता पुढील काळात आयटी कंपन्यांचे नशीब पालटणार असून या कंपन्यांना मोठा फायदा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सध्या, याबाबत जे काही अंदाज येत आहेत त्याद्वारे तर असेच सांगण्यात येत आहे.
कोरोना महामारीच्या काळात देशातील बहुतांश आयटी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम पद्धतीने कामकाज सुरू आहे. याचा फायदा कंपन्यांना होत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या मागणीमुळे या कंपन्यांना आता जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या मागणीत वाढ होईल तसेच मागील आर्थिक वर्षाच्या मागणीचाही फायदा मिळेल, असे इक्रा या संस्थेने म्हटले आहे.
आयसीआरए या रेटींग एजन्सीने सांगितले, की 2022 च्या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या महसूलात 9 ते 12 टक्के आणि त्या पुढील आर्थिक वर्षात 6 ते 9 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सध्या कमी होत आहे. मात्र कोरोनाचा धोका अजून कायम आहे. नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. विदेशात तर या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बहुतांश कंपन्या अजूनही कर्मचाऱ्यांना ऑफीसमध्ये बोलावण्यास तयार नाहीत. असे असले तरी याचा मोठा फायदा कंपन्यांना मिळत आहे. कंपन्यांचा खर्च कमी झाला आहे. तसेच आयटी कंपन्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कोर मॉडर्नायजेशन, क्लाउड मायग्रेशन आणि अन्य प्रकारच्या तंत्रज्ञान वापराचा कल वाढत आहे. यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात डिजिटल मॉडेलकडे वळत आहेत.
COMMENTS