शर्मिला गोसावी यांचा अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्काराने सन्मान! अहमदनगर : सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी बरोबरच साहित्यिक कार्यात शब...
शर्मिला गोसावी यांचा अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्काराने सन्मान!
अहमदनगर : सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी बरोबरच साहित्यिक कार्यात शब्दगंधचे योगदान मोठे असुन चळवळीच्या संस्थापक सदस्या म्हणुन शर्मिला गोसावी यांचे कार्य विस्तारत जाणारे आहे. त्यामुळेच त्यांचा गौरव करतांना आनंद होत आहे. असे मत अभिनव खान्देश परिवाराचे प्रमुख प्रभाकर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
धुळे येथील नलिनी सुर्यवंशी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शर्मिला गोसावी यांना तपोवन रोड वरील निवासस्थानी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, उपाध्यक्ष सुभाष सोनवणे, खजिनदार भगवान राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर पुरस्कार वितरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य झाले नसल्याने अगदी छोटेखानी कार्यक्रम घेत या पुरस्कारांचे वितरण केले जात असल्याची माहिती श्री. सूर्यवंशी यांनी दिली.
यांचाही झाला सन्मान !
डॉ.गुंफा कोकाटे, श्रीरामपूर, स्वाती राजेभोसले, पुणे, रिताताई जाधव,मुंबई, सरोज आल्हाट, नाशिक, वृंदा कुलकर्णी, कोल्हापूर, सविता दरेकर, नाशिक, सुनीता बहिरट, आळे, ज्योत्स्ना डासाळकर, कोल्हापूर आदी महिलांनाही अभिनव खानदेश प्रेरणादायी महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शर्मिला गोसावी यांच्याविषयी :
अहमदनगर मधील साहित्यिक वातावरण सुसंस्कृत ठेवण्यामध्ये प्रा.शर्मिला गोसावी यांचा महत्वाचा वाटा आहे. त्या श्री.साई इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषदच्या संस्थापक सदस्या आहेत. त्यांची बांगड्यांची खैरात, नजराणा, मनमीत अशी पुस्तके प्रकाशित असून वन्स मोअर मराठी कविता व मनातला पाऊस चे त्यांनी संपादन केलेले आहे. १४ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन केलेले असून आकाशवाणी अहमदनगर, पुणे येथून तब्बल ११ वेळा कविता वाचन केले आहे. उत्कृष्ट निवेदिका म्हणून साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन-निवेदनाचे काम त्या करतात.
पुरस्कारार्थी शर्मिला गोसावी यांचे राजेंद्र उदागे यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्रासह रक्कम २००० ची पुस्तकं शर्मिला गोसावी व सुनील गोसावी यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकार केला. .
पुरस्काराला उत्तर देतांना शर्मिला गोसावी म्हणाल्या की, 'अभिनव खान्देश परिवार हे साहित्यातील एक कुटुंब असुन या कुटुंबातील खानदेश मधील जेष्ठ सदस्यांनी दिलेली ही शाब्बासकीची थाप आहे. या पुरस्काराचा नम्रपणे मी स्वीकार करत असल्याचे म्हटले आहे. तसेच महिलांनी लेखनातून व्यक्त व्हावे, असे आवाहन केले. महिलांचे प्रश्न, समस्या, भाव भावनांचे हिंदोळे नव्या साहित्यातून यायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार वितरण समारंभास प्रा.बबनराव गिरी, मारुती सावंत, मकरंद घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. सुनील गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले.
COMMENTS