हाळ जि. सांगली येथे रिलीफ किटचे वितरण करतांना प्रा. भारती दानवे 'स्वयंभू'च्या तरुण शिलेदारांसमावेत . प्रतिनिधी : अहमदनगर येथ...
हाळ जि. सांगली येथे रिलीफ किटचे वितरण करतांना प्रा. भारती दानवे 'स्वयंभू'च्या तरुण शिलेदारांसमावेत. |
प्रतिनिधी : अहमदनगर
येथील स्वयंभू युवा प्रतिष्ठानने पूरग्रस्त भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोहच करत दिलासा दिला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने हाळ (ता. वाळवा, जि. सांगली) या गावी पुरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक किराणा वस्तूंसह पाणी बॉक्सचे वाटप करण्यात आले. शनिवारी (दि. ७ ऑगस्ट) ही मदत पूरग्रस्तांना सुपूर्द करण्यात आली.
सध्या महाराष्ट्र महापुराच्या नैसर्गिक आपत्तीशी लढा देत आहे. पुरस्थितीने प्रामुख्याने ठाणे,चिपळूण, कोकण, याभागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. माध्यमांच्या आणि सरकारी पथकांच्या नजरेत हा भाग प्रथम आल्याने या भागात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. परंतु, या महापुराचा फटका सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना बसला. ही गावे पाण्याखाली आसताना सुध्दा त्यांना आजपर्यंत सरकारकडून किंवा इतर कुणाचीही मदत पोहचली नाही. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते किरण पाटील यांच्या मार्फत समजली.
ही माहिती समजताच स्वयंभू प्रतिष्ठानच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतनिधी संकलनाचे काम हाती घेतले. केवळ आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. अहमदनगर जिल्ह्यातील स्वयंभू परिवार एकजुटीने या मदतकार्यात सहभागी झाला.
अहमदनगर शहरातील 'खरेदिवाला' मेगामार्ट यांनी मदतकार्य सहज व सोपे व्हावे, यादृष्टीने 'रिलीफ किट' पॅकिंगचे काम हाती घेऊन अल्पावधीत ते पूर्ण केले. हाळ या गावच्या परिसरातील १२० कुटुंबियांना 'रिलीफ किट'सह पाणी बॉक्स व कपड्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रा. भारती दानवे, पांडुरंग काळे, स्वयंभुचे अध्यक्ष सागर नगरे, सचिव संतोष वाघ, सौरभ राऊत, ओंकार काळे, पवन क्षीरसागर, ऋषीकेश चव्हाण, अमृता माळी, ज्ञानेश्वरी भालेराव, प्रतिभा गांधी, दिक्षा गायकवाड, किरण पाटील उपस्थित होते.
'स्वयंभू'च्या तरुणांना सामाजिक जाणिव : प्रा. दानवे
महाविद्यालयीन तरुण - तरुणींनी एकत्र येत स्वयंभूची स्थापना केली आहे. रक्तदान चळवळ उभी करून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या या तरुणांना सामाजिक जाणिव असल्याने संकटात असणाऱ्यांना मदत करण्याचा त्यांचा 'पिंड' आहे. त्यातूनच ते विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरांनी समाजात चांगली पिढी निर्माण केली आहे. त्याच योजनेची जबाबदारी स्वीकारली असल्याने स्वयंभूचे काम पाहून अभिमान वाटतो.
COMMENTS