अहमदनगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढच्या पाच-सहा महिन्यांवर निवडणुका आहेत. त्यात तरुण पिढीला ...
अहमदनगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढच्या पाच-सहा महिन्यांवर निवडणुका आहेत. त्यात तरुण पिढीला संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहेच. मात्र, तरुणांनी राजकारणात संयम ठेवला पाहिजे. उथळपणा राजकारणात कामी येत नाही. पक्षावर श्रद्धा आणि सबुरी असणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीने कायम न्याय दिला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक सीताराम काकडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव नरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, गौरव नरवडेसारख्या उमद्या तरुणांना मोठं भविष्य आहे. सामाजिक हिताची आणि सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना आणि मुद्यांना हात घातला की, लोकही अशा कार्यकर्त्यांना डोक्यावर घेतात.
यावेळी आमदार निलेश लंके यांचे मोठेबंधू दीपक लंके, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी रामकृष्ण कर्डीले, रा. वि. शिंदे, युवानेते अमोल जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, उपसरपंच अंकुश शेळके, हारुण शेख , शिवसेना तालुकाध्यक्ष प्रकाश कुलट, यशवंत तोडमल, संभाजी गडाख, मनोज भालसिंग, अनिल नरवडे आदींसह गौरव नरवडे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतपर भाषणे केली.
छोट्याशा गावांवर नेहमीच अन्याय झाला : सोनवणे
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत मतांची गोळाबेरीज लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी कायम मोठ्या गावच्या नेत्यांना उमेदवारी दिली. तुलनेने छोट्या गावचे पुढारी फक्त इतरांसाठी मतं मागायला ठेवले. त्यामुळे वर्षानुवर्षे हा अन्याय सहन करावा लागला आहे. मात्र, छोट्या गावच्या सर्वपक्षीय नेत्यांनी ठरवले तर क्षमता असणाऱ्या नवतरुणांच्या मागे उभे राहिल्यास नवे नेतृत्व आकार घेतील, अशी भावना हिंगणगावचे सरपंच आणि सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रम जरी वाढदिवसाच्या निमित्ताने असला तरी चर्चा मात्र आगामी निवडणुकीचीच रंगली होती. त्यामुळेच या कार्यक्रमाला राजकीय दृष्टिकोनातून आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खातगावचे उपसरपंच ज्ञानेश्वर पठारे यांनी केले. तर गौरव नरवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS