पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना देशभरात बेघरांना हक्काचा पक्का निवारा मिळावा म्हणून केंद्र व राज्य सरकारे प्रयत्नश...
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना
देशभरात बेघरांना हक्काचा पक्का निवारा मिळावा म्हणून केंद्र व राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळतो. पात्र लाभार्थ्यांकडे स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध असणे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असते. मात्र, अनेकांकडे स्वमालकीची जागा नसल्याने ‘ही’ बेघर माणसं घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहत होती. आता मात्र, केंद्र सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना कार्यान्वित केल्याने लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. ही शासकीय मदत कशी मिळवायची याबाबत माहिती घेऊयात.
केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा आवास योजना व राज्य सरकार पुरस्कृत अन्य आवास योजनेतील दारिद्र्य रेषेखालील पात्र लाभार्थ्यांना केवळ जागेअभावी लाभ मिळत नाही. ही बाब विचारात घेऊन सन २०१५- १६ पासून दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन बेघर कुटुंबाना घर बांधकामास जागा खरेदी करण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना’ या नावाने योजनेस मान्यता मिळाली आहे.
किती मिळणार लाभ
बेघरांना घर बांधकामास जागा खरेदी साठी इंदिरा आवास योजनेतील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबास केंद्र सरकारकडून १० हजार रु. तर या योजनेंतर्गत ४० हजार असे एकूण ५० हजारांचे अर्थसहाय्य प्राप्त होते.
रमाई व शबरी आवास योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील पात्र कुटुंबास ५० हजार रुपयांपर्यंत जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळू शकते. दारिद्र्य रेषेच्या वरील कुटुंबास या योजनेचा लाभ घेता येत नाही.
निकष :
घरकुलांचे बांधकाम हे किमान २० चौरस मी. इतके असणे अपेक्षित आहे. तसेच शौचालय, वापरासाठी आवश्यक मोकळी जागा असा सारासार विचार करून किमान ५०० चौरस फुट जागा खरेदी करणे अपेक्षित आहे.
मोठ्या ग्रामपंचायती किंवा शहरालगत असणाऱ्या गावांच्या हद्दीत बाजाराभाव आणि जागेची उपलब्धता लक्षात घेता एकापेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या संमतीने व स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने दोन किंवा तीन मजली इमारत बांधता येऊ शकते. किमान जागा ५०० चौरस फुट असणे हे बंधनकारक आहे.
प्रत्यक्ष जागेचे क्षेत्रफळ ५०० चौरस फुटांपर्यंत असल्याने जागेची किंमत व ५० हजार रु. यापैकी जे कमी असेल ती रक्कम लाभार्थ्याला मिळेल. जागेची किंमत ५० हजारांपेक्षा जास्त असल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याने दिल्यास त्यास या योजनेचा लाभ घेता येईल.
बेघर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून जागा निवड आणि खरेदी प्रक्रिया पार पडते. खरेदी प्रक्रिया पार पडल्यावर जागा मालकाला अदा केली जाईल. तसे लाभार्थ्याकडून प्रतिज्ञापत्र करून घेतले जाईल.
निधीची उपलब्धता :
आर्थिक वर्षात उपलब्ध निधीच्या तुलनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या निश्चित केली जाते.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे संपर्क साधावा.
COMMENTS