कर्जत : गेल्या आठवड्याभरापूर्वी कर्जत तालुक्यातील मौजे घुमरी सजा कोकणगाव येथील तलाठी आणि त्याने कार्यालयीन कामासाठी ठेवलेला खाजगी पंटर लाचलु...
कर्जत : गेल्या आठवड्याभरापूर्वी कर्जत तालुक्यातील मौजे घुमरी सजा कोकणगाव येथील तलाठी आणि त्याने कार्यालयीन कामासाठी ठेवलेला खाजगी पंटर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात अडकला होता. नोंदणी द्स्ताप्रमाणे सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी एक हजार रु. लाच घेतल्याप्रकरणी सचिन क्षीरसागर यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, लाचलुचपत पथकाने तलाठी मुजीब शेख याला सोयीस्कररित्या या गुन्ह्यातून वगळले आहे. याप्रकरणी मोठी आर्थिक तडजोड झाल्याची कर्जत तालुक्यात चर्चा रंगली आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तलाठी शेख याची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी घुमरी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
तक्रारदार प्रविण अनभुले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तलाठी शेख याला गुन्ह्यातून का वगळले, याचे कारण अद्यापही आम्हाला कळले नाही. पथकाची ही कृती संशयास्पद आहे. त्यामुळे याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच शासन निर्णय २०१६/ प्र.क्र. ४७५ / ई-१० यानुसार तलाठ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी कोणताही खाजगी इसम / व्यक्ती ठेवता येत नाही. सदर शासन नियमांचा भंग करून तलाठी मुजीब शेख याने सचिन क्षीरसागर याच्यामार्फत कार्यालयीन कामकाज चालवत होता, आहे. तलाठी शेख याने खाजगी व्यक्ती कामाला ठेवून शासन नियमाचा भंग केला आहे. संबधित प्रकरणी चौकशी करण्यात यावी, आणि तलाठी मुजीब शेख यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
तलाठी शेख हे कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्यास नाहीत, त्यांच्या कार्यालयीन उपस्थितीबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निवेदनावर तक्रारदार प्रवीण अनभुले, विशाल चितळे, प्रवीण संभू अनभुले यांच्या सह्या आहेत.
जिल्हाधिकारी ग्रामस्थांच्या या मागणीवर गांभीर्याने लक्ष घालणार की लाचलुचपत विभाग आणि कर्जत येथील महसुली अधिकाऱ्यांप्रमाणेच ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करणार अशी घुमरी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी
छोट्या मोठ्या महसुली कामांसाठी शेतकरी आणि सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या, राजरोसपणे पैशांची मागणी करणाऱ्या तलाठी मुजीब शेख यांची उच्च स्तरीय समितीमार्फत विभागीय चौकशी झाली पाहिजे. शासन नियमांचा भंग करून खाजगी इसम कामावर ठेवणे, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तलाठी शेख यांच्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी प्रवीण दत्तात्रय अनभुले यांनी केली आहे.
COMMENTS