अहमदाबाद : कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला सुमारे शंभर दिवस उलटले आहेत. तरीही केंद्र सरकार मागे हटायला तयार नाही. आंदो...
अहमदाबाद :
कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला सुमारे शंभर दिवस उलटले आहेत. तरीही केंद्र सरकार मागे हटायला तयार नाही. आंदोलकांशी चर्चा करायलाही तयार नाही. केंद्राने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पंजाबमध्ये भाजपचे आमदार अरुण नारंग यांना संतप्त शेतकऱ्यांनी नागडे करून मारहाण केली. तेथील राज्यपाल व्ही. पी. सिंग बाडनोर यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना खुलासा मागितला आहे.
याच मुद्द्यावरून गुजरात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केंद्र सरकारला घेरले आहे. त्यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर लिहले आहे की, पंजाबमधील भाजपच्या आमदाराला झालेल्या मारहाणी प्रकरणी थेट राज्यपाल यांनी लक्ष घातले आहे. इतकेच नव्हे तर थेट मुख्यमंत्री यांना खुलासाही मागितला आहे. दुसऱ्या बाजूला बिहार विधानसभेत महिला आमदारांना पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी तेथील राज्यपालांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. कारण पंजाबमध्ये कॉंग्रेस सत्तेत आहे तर बिहारमध्ये भाजपा सत्तेत सहभागी आहे.
केंद्रातील सरकार राज्यपालांच्या मार्फत असा हस्तक्षेप करत असल्याच्या प्रकाराकडे लक्ष वेधत भाजपा सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याबाबत हार्दिक पटेल यांनी टीका केली आहे.
COMMENTS