वाहिरा हे गाव संत शिरोमणी शेख महंमद महाराजांची जन्मभूमी. हे एक ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आष्टी तालुक्यातील हे गाव अ...
वाहिरा हे गाव संत शिरोमणी शेख महंमद महाराजांची जन्मभूमी. हे एक ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आष्टी तालुक्यातील हे गाव अहमदनगर पासून 45 किमी अंतरावर आहे. संत शेख महंमद महाराजांचे गाव असल्याने गावातील व गावाच्या पंचक्रोशीतील भाविक नेहमी दर्शनाला येत असतात. दरवर्षी यात्रेला भाविक महाराष्ट्राच्या काना-कोपर्यातून येतात. संत शेख महंमद महाराजांचे दर्शन घेऊन धन्य धन्य होतात. ‘हिंदू-मुस्लीमातील द्वैत नाहीसे करणारी महान विभूती’, म्हणून संत शेख महंमद महाराजांचा उल्लेख केला जातो. महाराजांनी आयुष्यभर भक्ती व ज्ञानाचा प्रचार प्रसार केला. अंधश्रद्धा, कर्मकांड ,असत्य, अधर्म विरुद्ध बंड पुकारले. महाराजांनी योगसंग्राम, पवनविजय, निष्कलंक प्रबोध असे ग्रंथ, अनेक अभंग रचना लिहिल्या आहेत. महाराजांनी आयुष्यभर कीर्तन, प्रवचन, अभंग यातून समाज उद्धाराचे कार्य केले. लोकप्रबोधनाचे कार्य त्यांनी केले. ते वारकरी संप्रदायाचे मुख्य आधारस्तंभ झाले. सर्वसमावेशक असा वारकरी संप्रदाय वाढविला.
असे हे महान संत वाहीरा भूमीत जन्मले, त्यांचे कार्य भारतभर आहे. वाहिरा या ठिकाणी भाविक आले की, महाराजांचे कार्य, त्यांचे विचार , अभंग, ग्रंथ या विषयी चौकशी करायचे. ही गरज ओळखून गावातील बुद्धिजीवी तरुण , अध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार एकत्र आले. मागील वर्षी मार्च 2020 यात्रेनिमित्त सर्वजण जमले. यात श्री. तहसीलदार वैभव फरतारे साहेब, श्री. ए.पी.आय आनंद पगारे साहेब, ह.भ.प. सिद्दिनाथ मेटे महाराज, श्री. इंद्रकुमार झांजे सर, श्री. मारुतीराव आटोळे (उद्योजक), श्री.किसन आटोळे सर, श्री. हनुमंत झांजे साहेब, श्री. सदाशिव पगारे सर, श्री. सोमीनाथ शेलार सर, ह.भ.प. घोडके महाराज, ह.भ.प. सोमनाथ महाराज मेटे, श्री. दत्ता झांजे सर, श्री. रमेश झांजे, श्री.सतीश आटोळे (उपसरपंच), ह.भ.प. मोसिम महाराज अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी एकत्र आली. आपली भूमी महान संतांची भूमी आहे. संत शिरोमणी शेख महंमद महाराजांचे कार्य , विचार सर्वदूर पोहोचविणे आपली जबाबदारी आहे. त्यांचे साहित्य प्रकाशित केले पाहिजे. मंदिर परिसराचा विकास झाला पाहिजे. यासाठी श्री. संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठान मार्फत आपण हे कार्य करावे असे सर्वांचे ठरले.
यात्रा संपली आणि कोरोनाने धुमाकूळ घातला. सर्व जग ठप्प झाले. कडक लॉकडाऊन सुरू झालेले होते. सारे जग शांत होते. प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती होती. परंतु कोरोनाला संधी मानून प्रतिष्ठानने भरीव असे कार्य केले. ना भूतो न भविष्यती असे म्हटले तरी चालेल. यात श्री.किसन आटोळे सर यांनी संत शेख महंमद महाराज चरित्रलेखनाचे कार्य हाती घेतले. तसेच ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराजांनी सार्थ योगसंग्राम चे काम हाती घेतले. हे लिहित असताना शेख महंमद महाराजांचे साहित्याचे भांडार हाती आले. चार पाच तरुण एकत्र आले. ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज, श्री रूपचंद झांजे चेअरमन, श्री.सतीश आटोळे, श्री.किसन आटोळे सर यांनी चरित्र पाट्या खराब झालेल्या होत्या. ते बोर्ड पुन्हा डिजिटल करून बसविण्याचे ठरविले. काम थोडे होते. ग्रामस्थांना आवाहन केले. आणि चमत्कार घडावा तसे घडले. चरित्र बोर्ड तर झालेच परंतु दीडशे अभंग बोर्डही बसून झाले. सव्वा लक्ष रुपये जमा झाले होते. मंदिरात अभंग बोर्ड लावल्याने आलेले भाविक संत शेख महंमद महाराजांचे विचार वाचू लागले. अभंग पाठ करू लागली. नवीन खजिना मिळाला आहे . असा भास प्रत्येकाच्या मनात तयार झाला.
प्रतिष्ठान मार्फत दुसरी मोहीम हाती घेतली. ती होती व्यसनमुक्तीची. याच काळात अनेक तरुणांनी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली. जवळ जवळ तीस पस्तीस जणांनी व्यसन सोडून दिले. आज अनेक तरुण सुखाचा संसार करत आहेत. आदर्श जीवन जगत आहेत. याच वेळी संत शिरोमणी शेख महंमद महाराज हे योगी श्रेष्ठ संत होते. महाराष्ट्रातील प्रत्येक संतांची आरती आहे. तशी शेख महंमद महाराजांची सुद्धा आहे. परंतु अनेक वर्षांपासून ती कोणी म्हणत नव्हते. ठराविक कार्यक्रम, यात्रा, दिंडी, सप्ताह याच दिवशी ती म्हटली जायची. परंतु प्रतिष्ठानने ही आरती दररोज घेण्याचे ठरविले. आणि सुरु झाली मग आरती. आरतीचा आवाज पंचक्रोशीत घुमू लागला. निस्तेज असलेला समाज तेजस्वी झाला. दररोज सकाळी सात वाजता शेकडो भाविक जमू लागले. शेख महंमद महाराजांचा जयजयकार सुरु आहे. दररोज सकाळी महाप्रसाद होतो. आज नित्यनेमाने हा उपक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहे. हे करत असताना संत शेख महंमद महाराज मंदिर परिसरात छोटेसे उद्यान असावे . असा विचार मनात आला. हे उद्यान संत शिरोमणी शेख महंमद महाराजांच्या मातोश्री आदर्श माता फुलाई यांचे नावे करण्याचे ठरवले. या उद्यानासाठी गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेकांनी भरीव असे योगदान दिले. आज या उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्या बसविल्या आहेत. लहान मुले खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतात. अनेक बेंच टाकल्याने आलेले भाविक विसावा घेतात. दर्शन झाल्यानंतर मनसोक्त गप्पा मारत बसतात. झाडांना ठिबक केल्याने झाडे टवटवीत झाली आहेत. उद्यानातील कमान सर्वांचे लक्ष वेधून घेते. बाहेरगावाहून आलेले लोक अचानक झालेला बदल पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. गावाविषयी सकारात्मक दृष्टिकोन झाला.
प्रतिष्ठानने गेल्या वर्षभरात महापुरुषांची जयंती उत्सव, स्पर्धाचे आयोजन केले. असे वेगवेगळे उपक्रम प्रतिष्ठानने राबविलेले आहेत. या चांगल्या कामासाठी सर्व गाव सहभागी होत आहे. कसलाही भेदाभेद राहिला नाही. गट-तट राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे काम होत आहे. निश्चित हे आदर्शवत काम आहे. काम करत असताना अडचणी येतात परंतु आपला उद्देश चांगला असेल तर निश्चित मार्ग मिळतो. आणि ही तर संतांची भूमी आहे. ज्या संतांनी समाजातील भेदाभेद, अमंगळ, अनिष्ट प्रथा, वाईट चालीरीतीवर प्रहार केले, समाज जागा केला. हाच आदर्श, विचार घेऊन संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठान कार्य करत आहे.
शेख महंमद महाराजांनी सांगितलेला सन्मार्ग सर्वजण अंगीकारत आहेत.
मनुष्यजन्म रत्न । तेथे का हो वाईटपण॥1॥
नरदेह संचित दैवे। सर्वांभूती गोड व्हावे॥2॥
नका निघू अध:पाती । शेख महंमद विनवीती ॥3॥
मिळालेला हा मनुष्य जन्म चांगल्या कार्यासाठी खर्च करणे . हेच मनुष्यजन्माचे प्रयोजन आहे. भगवंताचे नामस्मरण करा, मानवताधर्म जपा. सर्वांशी गोड रहा, गोड बोला. कुणाला वाईट वाटेल असे वागू नका. असे आग्रहाने विनंतीपूर्वक महाराज आपल्याला अभंगातून सांगतात. संत श्रेष्ठ शिरोमणी शेख महंमद महाराजांचे कार्य, विचार, अभंग, ग्रंथ समाजापर्यंत पोहचविणे. हा उद्देश घेऊन प्रतिष्ठान कार्य करत आहे. आपण सर्वजण यात सहभागी होऊन हे कार्य पुढे नेऊ या.
लेखक
श्री. किसन आटोळे सर
अध्यक्ष, श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठाण
श्रीक्षेत्र वाहिरा, ता.आष्टी, जि.बीड. मो. 9404639537
COMMENTS