पाथर्डी : आज शिक्षणमहर्षी बाबूजी आव्हाड यांची जन्मशताब्दी. त्यानिमित्ताने त्यांच्या सामाजिक वाटचालीवर टाकलेला प्रकाशझोत. मानवी समुदायाच्या ...
पाथर्डी :
मानवी समुदायाच्या या अथांग सागरात अशी काही नवरत्ने जन्माला येतात की, जी स्वतःच्या तेजाने, दैदिप्यमान चारित्र्याने व चरित्राने मानवजातीचे दीपस्तंभ बनून राहतात व इतरांचे लक्ष वेधून घेत असतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बाबुजींनी हिरिरीने भाग घेतला आणि स्वातंत्र्यसेनानी म्हणून अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्व सामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी वेचले. बाबूजींचे मुळगाव शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द असून वडील गणपतराव आव्हाड हे ग्वाल्हेरच्या संस्थानामध्ये राजे शिंदे यांच्या दरबारात मेजर पदावर कार्यरत होते. बाबुजींचा जन्म ग्वाल्हेर येथे ३१ मार्च १९२१ रोजी झाला. ग्वाल्हेर येथेच त्यांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पाचवी ते सातवीचे शिक्षण हंडाळवाडी, पाथर्डी येथे झाले. त्यानंतर पुन्हा आठवी ते अकरावी पर्यंतचे शिक्षण ग्वाल्हेर येथे त्यांनी पूर्ण केले. वडील लष्करात नोकरीला असल्याने वडिलांचे संस्कार त्यांचा एकनिष्ठपणा व देशप्रेम, याचा परिणाम बाबुजींच्या मनावर शालेय वयातच झाला. वडील गणपतराव आव्हाड सतत लोकांच्या सुखदुःखात धावून जात असल्याने वडिलांकडूनच सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांना मिळाली. हॉकी, फुटबॉल व नेमबाजी या मैदानी खेळांमध्ये त्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यावर झालेले संस्कार व वागण्यातला बाणेदारपणा यामुळे नवीन काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्या मनात तयार झाली. त्यांचा स्वभाव शांत व विनोदी असल्याने अनेक मित्र त्यांनी जोडले. याच दरम्यान त्यांना वडिलांच्या आग्रहामुळे.
संस्थानमध्ये कॅप्टन म्हणून नोकरी करावी लागली. परंतु नोकरीमध्ये त्यांना फार रस नव्हता, तसेच गुलामगिरी करणे हे त्यांना लहानपणापासूनच आवडत नव्हते. त्यामुळेच नोकरी सोडून पाथर्डीला मायभूमीत येऊन 1942 मध्ये चलेजाव चळवळ आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग राहिला त्याचबरोबर हैदराबाद मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शिक्षणाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झालेला असल्याने नोकरी सोडून गोरगरीब, दलित, वंचित आणि बहुजन समाजाला मदत करण्याची इच्छा निर्माण झाल्यामुळे त्यांनी सामाजिक कार्याला गावातूनच सुरुवात केली. उपेक्षित तळागळातील गरिबांना मदतीचा हात दिला. अनेक विचारवंत, थोर पुरुषांचा आणि समाज सुधारकांच्या कामगिरीचा त्यांच्यावर पगडा असल्या कारणाने त्यांनी पाथर्डी सारख्या कायम दुष्काळी डोंगराळ व कमी पर्जन्यमान असणाऱ्या ,कोरडवाहू शेती,सततचा दुष्काळ, शेतमजूर, ऊस तोडणी कामगार आणि डोंगराळ भागातील कोळसा व्यवसायिक म्हणजे खऱ्या अर्थाने भटक्या गरिबीत जीवन जगणारा समाज, कष्टकरी कामगार व शोषित समाजासाठी आपले कार्य अविरतपणे सुरू केले. आजही मला तो दिवस आठवतो महाविद्यालयात हजर झाल्यावर बाबुजीच्या भेटीसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला प्रेमाने आत बोलावले, जवळ बसवले त्यांच्याकडे पाहताक्षणी छाप पाडणारे रुबाबदार व्यक्तिमत्व, करारी मुद्रा आणि बाबुजींच्या लुकलुकत्या डोळ्यात मला सामान्य माणसाचे दुःख वेदना व उद्याची स्वप्न दिसली. त्यांनी आम्हाला सांगितले तुम्हाला उद्याची पिढी घडवायची आहे, वेगवेगळी पुस्तके वाचा, अभ्यास करा, कष्ट आणि आपल्या मतावर ठाम रहा कितीही अडचणी आल्यातरी त्यातून मार्ग सापडेल परंतु विद्यार्थी घडवतांना त्यांना मदत करणे हे कधीच विसरू नका त्यांच्या या विचाराने आम्ही भारावून गेलो त्यांचा हा सामाजिक विचार आणि संस्कार त्यांनी आम्हाला दिला तो घेऊनच आम्ही पुढे काम करत राहु अशी ग्वाही आम्ही त्यांना दिली. त्याच वेळी समाजाच्या सुखदुःखाशी बांधले गेलेले समाज कार्यात वाहुन घेतलेले समाजाचे आधारवड म्हणून बाबुजी आम्हाला भावले. परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपली वाट काढत अन् तिला बळकट करत चालणारी काही थोडी माणसे असतात त्यापैकीच बाबुजी एक होते. समाज जीवनात वावरत असताना व्यक्तिगत स्वार्थ त्यांनी कधीही आडवा येऊ दिला नाही दूरदृष्टी आणि बदलत्या काळाचे त्यांना भान होते शिक्षणाचे महत्व ओळखून त्यांनी संस्था उभी केली बाबुजी हे रात्रंदिवस काम करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या संसार उभे केले. स्वतःच्या सुखाचा विचार न करता एक माणूस किती जणांचे कल्याण करू शकतो यामधून त्यांच्या ध्येयवेड्या त्यागाची प्रचिती आपल्याला येऊ शकते. वड सावली देतो आणि वडाच्या पारंब्या नवी पिढी घडवत असतात त्याचप्रमाणे बाबुजींचे कार्य होते. बाबुजी कम्युनिस्ट पक्षाकडून १९५७ ते ६२ व १९६२ ते ६७ या कालावधीत दहा वर्षे विधानसभेचे सदस्य होते त्यांच्या कार्यकाळात आरोग्य, पाणीटंचाई, तालुक्यातील अंधार दूर करण्यासाठी वीज प्रश्न, डोंगराळ भागातील रस्ते या मूलभूत सुविधा त्यांनी तालुक्यात आणल्या नालाबंडिगचे काम सुरु केले तसेच पाणी अडवा आणि पाणी जिरवा या योजनेला त्यांच्या मागणी मुळेच विधानसभेत मंजुरी मिळाली. तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाय योजना म्हणून वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना उभारणीत त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली व कारखान्याला परवानगी मिळवलीच. याप्रसंगी बाबुजींनी सहकाऱ्यांची मीटिंग बोलावली आणि निर्णय घेतला दादा पाटील राजळे यांना चेअरमन करून मी स्वतः व्हाईस चेअरमन पद स्विकारतो. अनेकांना त्यांच्या या निर्णयाचे आश्चर्य वाटले बाबुजी असे का करतात कुणाच्या लक्षात येईना कारण चेअरमन होण्याऐवजी व्हाईस चेअरमन ते का होतात, परंतु नंतर त्यांनी आपल्या सहकार्यां ना विश्वासात घेऊन सांगितले की, अण्णासाहेब शिंदे मंत्री आहेत आणि दादा पाटलांचे ते नातेवाईक आहेत मला पद मिळण्यापेक्षा जनता सुखी होईल हा त्यांचा विचार किती मोठा होता त्यानंतर जनतेने शेतकऱ्यांनी त्यांना उस्फूर्तपणे साथ दिली त्यांच्या महानतेला सलाम केला. त्यांनी शेतकऱ्यांचे दुःख ओळखले आणि कारखाना जन्माला घातला. बाबुजीचा हा मोठेपणा सत्तेसाठी नव्हे तर सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी ते झगडत होते हे या प्रसंगातून दिसून येते. शिक्षणाचे महत्व ओळखून सर्वसामान्यांसाठी त्यांच्या विकासासाठी व त्यांना दारिद्र्याच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली. पाथर्डी शेतकरी संघ, तालिबांध समिती, दुष्काळी परिषदांचे आयोजन आदी मध्येही बाबुजींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. बाबुजींनी या काळात सामाजिक चळवळ उभारून समाज एकसंघ करण्यासाठी अतिशय मोलाची कामगिरी केली. समाजात समतेची भावना निर्माण व्हावी आणि वंचित समाजाने आत्मनिर्भर व्हावे ही शिकवण बाबुजींनी समाजाला दिली.
"नही ज्ञानेन सदृश्यं, पवित्रमिह विद्यते!" हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी जनता महाविद्यालय, जनता विद्या मंदिर, संत गाडगे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोकमंगल पतसंस्था, किमान कौशल्य प्रशिक्षण योजना, श्रमिक विद्यापीठ, इत्यादी शैक्षणिक संस्था बाबुजींच्या दूरदृष्टीमुळे उभ्या राहिल्या. बाबुजींनी सर्वसामान्य समाजातील मुलांना शिक्षणाची दारे उघडली, शिक्षणामुळे खऱ्या अर्थाने शोषित व वंचित समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटले आणि तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांती निर्माण झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये हीच त्यांची तळमळ होती. विद्यार्थ्यांचे दुःख ओळखले आणि संस्था जन्माला घातली.बाबुजींनी आपल्या स्वतःच्या गावात हंडाळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेला स्वतःच्या मालकीची जमीन उपलब्ध करून दिलेली असल्यामुळे तेथे हजारो मुले शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या परिसरात समाजकल्याण विभागाला शासकीय वसतिगृहासाठी दोन एकर जागा उपलब्ध करून दिली या वसतिगृहात राहून दीन-दलितांचे हजारो मुलं आजही शिक्षण घेत आहेत. बाबुजींचे कार्य शिक्षणाविषयी, समाजाविषयी, दीन-दलितांविषयी त्यांची असलेली तळमळ कायमच स्मरणात राहील. न्यायासाठी झगडणारा हा महापुरुष २३ मार्च २००४ साली अनंतात विलीन झाला. काही माणसे जन्मताच मरतात तर काही माणसे जाताना आपल्या पाऊलखुणा ठेऊन जातात. आपले बाबुजी ही गेले पण जाताना संस्कारांचा पहाड उभा करून गेले. बाबुजींनी १००व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शब्दांकन :
प्रा. डॉ. अशोक कानडे,
इतिहास विभाग प्रमुख, बाबुजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी, जि. अहमदनगर
COMMENTS