सत्यमेव जयते समृद्ध गाव योजनेतील गावांचा पाणी फाउंडेशनकडून गौरव अहमदनगर : पाणी फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून जल समृद्धीसाठी ...
सत्यमेव जयते समृद्ध गाव योजनेतील गावांचा पाणी फाउंडेशनकडून गौरव
अहमदनगर : पाणी फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून जल समृद्धीसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. संस्थेच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा आयोजित केली जाते. नगर तालुक्यात ही स्पर्धा राबविली जात आहे. यात १४ गावांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातील सहा गावांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे बाबुर्डी बेंद, मांजरसुंबा, कोळपे आखाडा, सोनेवाडी, रांजणी, पिंपळगाव वाघा या गावांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.
या स्पर्धेत राज्यभरातून ९०० हून अधिक गावांनी सहभाग नोंदविला आहे. नगर तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. ही स्पर्धा २ वर्षे चालणार आहे. पहिल्या टप्प्यात चांगले काम करणाऱ्या गावांचा गौरव पाणी फौंडेशनकडून दि. २२ मार्च रोजी ऑनलाईन कार्यक्रमात करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, पाणी फौंडेशनचे प्रमुख कार्यवाहक सिने अभिनेते अमीर खान, किरण राव, मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी मान्यवर उपस्थित होते. अभिनेते जितेंद्र जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
या गौरव सोहळ्यास सहभागी गावांतील ग्रामस्थ, जलदूत, काही निमंत्रित जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आदींनी ऑनलाईन हजेरी लावली. गौरविण्यात आलेल्या गावांना स्थानिक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती तालुका समन्वयक दिलीप कातोरे यांनी दिली आहे.
COMMENTS