नगर तालुक्यातील आठवड येथील शेतकरी नानासाहेब मोरे यांचा दि. ६ मार्च रोजी विद्युत वहिनी अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सदर शेतकरी कुट...
नगर तालुक्यातील आठवड येथील शेतकरी नानासाहेब मोरे यांचा दि. ६ मार्च रोजी विद्युत वहिनी अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सदर शेतकरी कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मृत शेतकऱ्याचा दशक्रिया विधीच महावितरण कार्यालयात करू, असा इशारा देणारे निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एन. एम. धर्माधिकारी यांना दिले.
महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे एवढी मोठी दुर्दैवी घटना घडून एक शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झाले असताना देखील अद्यापपर्यंत महावितरण विभागामार्फत कुठल्याही प्रकारची दखल या घटनेबाबत घेतलेली दिसत नाही, ही गंभीर बाब आहे. आज त्याच मयत शेतकऱ्याचे जर वीजबील थकीत असते तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्या शेतकऱ्याच्या घरी वीजबिल वसुलीसाठी, वीजपुरवठा खंडित करण्यासाठी भरमसाठ चकरा मारल्या असता आणि आज त्याच शेतकऱ्याचा महावितरण कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू झाला आहे तरी एकाही अधिकाऱ्यांला त्या शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी वेळ नाही. सदर विभागाचा कोणताही अधिकारी तसेच कर्मचारी या घटनेना गंभीरपणे घेत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. मृत शेतकऱ्याचा दशक्रिया विधी होण्यापूर्वी त्या शेतकरी कुटुंबाला तरतुदीनुसार आर्थिक मदत करावी व या घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा भाजप नगर तालुका आठवड ग्रामस्थांच्या समवेत महावितरण कार्यालयातच दशक्रिया विधी करेल, असा इशारा या वेळी मनोज कोकाटे यांनी दिला.
COMMENTS