पुणे : ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे कितपत आवश्यक आहे हे करोनाच्या निमित्ताने अवघ्या जगाला पुन्हा एकदा समजले आहे. औद्योगिक क्रांतीच्या ...
पुणे :
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे कितपत आवश्यक आहे हे करोनाच्या निमित्ताने अवघ्या जगाला पुन्हा एकदा समजले आहे. औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली वाढते शहरीकरण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यांच्या जंत्रीत देश आणि जग अडकले असून त्याला आता शेती आणि ग्रामीण उद्योग हाच पर्याय असल्याचे अधोरेखित झालेले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने आता ग्रामोद्योगाचे महत्व जाणले आहे.
याबाबत माहिती देताना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात २-३ उद्योग सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे.
लघुउद्योग हे महत्वाचे खाते गडकरी साहेबांकडे आहे. त्यांनी त्यादृष्टीने ग्रामीण उद्योजक उभे करून ग्रामीण भागात रोजगार देण्यासाठीची कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्रालयाला दिलेल्या आहे. देशात कोणकोणता माल, उत्पादन आयात केला जातो याची माहिती घेऊन असे पदार्थ आणि उत्पादने ग्रामीण भागात बनवण्याचा हा मास्टर प्लॅन आहे.
आयातीला सशक्त भारतीय पर्याय निर्माण करून आयात रोखणे आणि निर्यात वाढवणे या उद्देशाने आणि त्याद्वारे ग्रामीण भागात सुबत्ता आणण्याच्या दृष्टीने ही महत्वाची योजना राबवली जाणार आहे. एमएसएमईतील अनिवासी भारतीय उद्योजकांशी व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.
ग्रामीण भागात परकीय गुंतवणूक आणण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी म्हटले की, एमएसएमई ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आज सकल राष्ट्रीय उत्पन्नात एमएसएमईचा सहभाग ३० टक्के आहे, ४८ टक्के निर्यात व ११ कोटी रोजगार निर्मिती या विभागाने केली आहे.
तसेच त्यांनी सांगितले की, गायीच्या शेणापासून निर्माण होणारा पेंटचा उद्योग प्रत्येक गावात सुरू व्हावा. केवळ १२ लाख रुपयांमध्ये हा उद्योग सुरू होतो. या उद्योगासाठीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
COMMENTS