कोलकत्ता : भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. भाजप नेहमीच जाहिरात आणि प्रचारात मोठी आघाडी घेत असल्याचे या पू...
कोलकत्ता :
भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. भाजप नेहमीच जाहिरात आणि प्रचारात मोठी आघाडी घेत असल्याचे या पूर्वीच्या निवडणूकांवरून दिसून येते. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूक प्रचारार्थ भाजपाने स्थानिक वृत्तपत्रांतून जाहिरात प्रसिद्ध केली होती. ‘ती’ जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भाजपने २४ लाख बेघरांना घर दिल्याचा दावा केला आहे. मात्र, उलटतपासणी करताना हा दावा फोल ठरला आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटर हँडलवर या दैनिक प्रभात खबर आणि सन्मार्ग या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचा फोटो पोस्ट केला आहे. ‘खोटं वारंवार सांगितले तरी, खोटेच असते’ अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहला आहे.
इंडिया टुडे या आघाडीच्या वृत्तवाहिनीने ‘या’ प्रकारची शहानिशा केली. त्यातून हे सत्य बाहेर आले आहे.
भाजपने २५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत पंतप्रधान मोदींच्या समवेत एका लक्ष्मी नामक महिलेचा फोटो आहे. त्यात लक्ष्मीदेवी असे म्हणतात की, ‘केंद्र सरकारच्या आवास योजनेतून मला घर मिळाले आहे. तसेच पश्चिम बंगालमधील २४ लाख बेघरांनाही या योजनेचा लाभ झाला आहे.’
इंडिया टुडेच्या प्रतिनिधीने या महिलेचा शोध घेतला आणि सत्य समोर आले. या महिलेला आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही. भाड्याच्या खोलीत सात सदस्यांसह राहतात. त्या शेतात मजुरी करत असताना एका छायाचित्रकाराने त्यांचा फोटो काढला होता, असे त्यांनी सांगितले. त्याचाच वापर करून भाजपाने ही जाहिरात बनवली आहे.
कॉग्रेसने यावर खरमरीत टीका करताना म्हटले आहे की, भाजपाचा विकास अशा पद्धतीने केवळ कागदावरच दिसून येतो. प्रत्यक्षात मात्र काहीच नसते. भाजपाने खोटी जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल केली असून गोरगरिबांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे.
COMMENTS