विशेष लेख : महाराष्ट्र या ‘मराठी’ भाषिक राज्याची निर्मिती झाल्यानंतर, या राज्याला दिशा देण्याचे आणि कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून राज्य...
विशेष लेख : महाराष्ट्र या ‘मराठी’ भाषिक राज्याची निर्मिती झाल्यानंतर, या राज्याला दिशा देण्याचे आणि कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून राज्यातच नव्हे तर देशात हरित क्रांती घडवून आणणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक. स्व. नाईक यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने प्रगतीची शिखरे सर केली. राज्याच्या सर्वांगीण विकासात आणि शेतकरी, कष्टकरी आदी सामान्य माणसाच्या जीवनमानात त्यांनी अभूतपूर्व बदल दिसून आले, याचे श्रेय खऱ्या अर्थाने वसंतराव नाईक यांनाच द्यावे लागेल. वसंतराव स्वतः उच्च शिक्षित व कृषीतज्ञ होते. त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या विकासाला दिशा आणि गती दिली. त्यांच्याबद्दल काही महत्वपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ.
• वसंतराव नाईककांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद यागावाजवळील गहुली या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता.
• त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते.
• महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविण्याचा विक्रम आजही त्यांच्या नावावर आहे.
• महाराष्ट्राच्या सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.
कौटुंबिक पार्श्वभूमी : नाईकांचे मूळ आडनाव राठोड असे होते; परंतु गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले. त्यावरून पुढे त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंगाचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी होनूबाई यांना दोन मुले झाली, राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते, पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले. वसंतरावच्या कार्यकाळात ‘नाईक’ हेच नाव पुढे रूढ झाले.
शिक्षण : वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल.एल.बी. ही पदवीही मिळविली (१९४०). त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांचा प्रभाव पडला.
महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील ‘घाटे’ या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. या स्नेहातुनच पुढे त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह वत्सलाबाई यांच्याशी झाला (१९४१). या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली. त्यातूनच वसंतरावांना पत्नी वत्सलाबाई ह्यांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले; पण वसंतरावांनी पूर्ण विचारांती हे लग्न केले होते. त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई यांचे बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाले होते, त्या वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सक्रीय राहिल्या.
वाटचाल :
वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (डिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय वसंतरावांकडेच जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले. अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द त्यांच्या वाट्याला आली. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. पुसद या छोट्या खेड्यातून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास मुंबई मार्गे दिल्ली झाला. त्यांची राजकीय वाटचाल ही कोणाही सामान्य माणसाला थक्क करणारी आहे.
त्यांच्या जयंती दिवस म्हणजेच १ जुलै रोजी राज्यभर कृषी दिन साजरा करण्यात येतो. हरित क्रांतीचे प्रणेते आणि सुधारणावादी नेते, रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले.
COMMENTS