सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रंगत आणली आहे. येथील लढत त्यांच्यामुळे दुरंगी-तिरंगी...
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रंगत आणली आहे. येथील लढत त्यांच्यामुळे दुरंगी-तिरंगी न होता आता थेट पंचरंगी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर यांनी प्रचारसभेत जाऊन भाजपवर आणि त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांवर कडाडून टीका केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारसभेत तुपकर म्हणाले की, पैसे आणि तलवारीच्या जोरावर जर राज्य मिळवता आले असते तर देशाचा पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अरुण गवळी झाला असता. एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. गव्हाणीत उड्या टाकल्या, त्या वेळी संत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना तलवारी दाखवल्या होत्या. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या असत्या तर अंबानी आणि टाटा पंतप्रधान झाले असते. चहावाले मोदी पंतप्रधान झाले नसते.
ही निवडणूक माजलेले साखरसम्राट विरुद्ध शेतकरी अशी आहे. विठ्ठल कारखान्यावर ६०० कोटींचे कर्ज केले असून विठ्ठल व त्यानंतर दामाजी हे दोन्ही कारखाने पवारांना घ्यायचे असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे. एकूणच या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्हींना शिंगावर घेतले आहे.
संपादन : विनोद सूर्यवंशी
COMMENTS