मुंबई : भारत आणि पाकिस्तान पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांदरम्यान होणारा क्रिकेट सामना पाहणे आणि अनुभवणे म्हणजे मोठी पर्वणीच. या उभय संघांमध्...
मुंबई :
भारत आणि पाकिस्तान पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांदरम्यान होणारा क्रिकेट सामना पाहणे आणि अनुभवणे म्हणजे मोठी पर्वणीच. या उभय संघांमध्ये क्रिकेटचा थरार अनेकदा क्रिकेटप्रेमींनी अनुभवला आहे. मात्र, खूप दिवसांपासून या दोन संघात क्रिकेट सामना किंवा मालिका खेळली गेली नाही. ही मालिका कधी खेळवली जाणार याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. टोकाचे वाद, प्रचंड इर्षा आणि जोश यांचा समन्वय साधणारी ‘ही’ बहुप्रतीक्षित क्रिकेट मॅच खेळविण्याचा मार्ग खुला झाला आहे.
‘पाकिस्तानच्या खेळाडू व सपोर्ट स्टाफला भारतात दाखल होण्यासाठीचा व्हिसा मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही’, अशी ग्वाही बीसीसीआयने आयसीसीला दिली आहे.
भारतात यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. त्यासंदर्भात पाकिस्तानच्या सहभागावरून उडालेल्या गोंधळावर आयसीसीनं मोठं पाऊल उचललं आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे चेअरमन एहसान मणी यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी खेळाडू व सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळण्याची ग्वाही देण्यात यावी अशी विनंती आयसीसीकडे केली होती. ''भारतानं आम्हाला व्हिसाबाबत लेखी आश्वासन द्यावं अन्यथा वर्ल्ड कप भारतातून यूएईत खेळवण्यात यावा,'' असे मत मणी यांनी व्यक्त केलं होतं. यावर आयसीसीने बीसीसीआय कडून खुलासा मागविला होता.
ऑक्टोबर महिन्यात हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने येतील. यानिमित्ताने आणखी एक थरारक टी-ट्वेंटी क्रिकेट मॅच रसिकांना पाहायला मिळणार आहे.
COMMENTS