प्रतिनिधी : रेशनच धान्य देशात कुठेही मिळणार गोरगरिब कुटुंबाना स्वस्तात धान्य मिळावे, यासाठी शासनाकडून स्वस्तधान्य योजना राबविली जाते. मात...
प्रतिनिधी :
रेशनच धान्य देशात कुठेही मिळणार
गोरगरिब कुटुंबाना स्वस्तात धान्य मिळावे, यासाठी शासनाकडून स्वस्तधान्य योजना राबविली जाते. मात्र, रेशनिंगमध्ये मोठा काळाबाजार केला जात होता. प्रत्यक्ष लाभार्थ्याला रेशनवरील धान्य वेळेत मिळत नव्हते. रेशनिंग दुकानदारांनी मनमानी कारभार केल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. आता मात्र, शासानाने ‘वन नेशन वन रेशन’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत देशातील 32 राज्यांमध्ये लाभार्थी कोणत्याही स्वस्तधान्य दुकानातून धान्य घेऊ शकतो. त्यासाठी केवळ रेशन कार्डला आधार कार्ड लिंक असणे अपेक्षित आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेस चांगला प्रतिसाद लाभला आहे.
राज्यात किंवा राज्यांतर्गत रोजगाराच्या निमित्ताने अनेक कुटुंबाचे स्थलांतरणाची प्रक्रिया नेहमीच चालू असते. स्थलांतरित कुटुंबाना रेशन मिळविण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने एक जानेवारी 2021 पासून वन नेशन वन रेशन अभियान सुरू केले. रेशनकार्डला आधारकार्ड लिंक असल्यास किंवा रेशन कार्डचा क्रमांक जवळ असल्यास प्रत्येक लाभार्थ्यांना देशात कोठेही धान्य मिळणार आहे.
मेरा राशन ऍप
रेशनिंग वाटप प्रक्रिया आणखी सुलभ व्हावी आणि त्यात पारदर्शकता यावी म्हणून शासनाने मेरा राशन नावाने नवीन ऍप तयार केले आहे. ते ऍप मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यास त्यावर रेशन कार्डवरील लाभार्थी व त्यांना मिळणाऱ्या धान्याचा तपशील कळणार आहे. कुटुंबातील सदस्यांची माहिती मिळणार असून, त्यानुसार धान्य मिळते की नाही हे समजणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची नावे पाहून घेता येतील.
32 राज्यात योजना सुरू
पश्चि म बंगल, आसाम, छत्तीसगड, दिल्ली ही राज्ये वगळता देशातील 32 राज्यात वन नेशन वन रेशन अभियान सुरू आहे. केंद्र सरकार रेल्वेच्या माध्यमातून योजनेची जनजागृती करणार आहे. स्थानिक पातळीवर जनजागृती करण्यात येणार आहे.
मनमानीला आळा
वन नेशन वन रेशन अभियानामुळे दुकानदारांची मनमानी संपणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या धान्याचा तपशील कळणार आहे. त्यामुळे धान्य आले नाही. पुढच्या महिन्यात येईल, अशी दुकानदारांची उत्तरे बंद होणार आहेत. या अभियानामध्ये दुकानदारांना मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येणार आहे. जास्त लाभार्थ्यांची नोंदणी झाल्यास तितकाच धान्य पुरवठा होणार आहे.
ऊसतोड मजुरांनाही मिळणार लाभ
नगर जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या 8 हजार 285 नागरिकांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी आदी जिल्ह्यांसह विदर्भ व मराठवाड्यातील मजूर ऊसतोडणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जातात. त्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. ते ज्या जिल्ह्यात जातील तिथे त्यांना रेशनवरील धान्य मिळणार आहे. त्यासाठी त्यांचे आधारकार्ड रेशन कार्डला लिंक असणे आवश्यूक आहे.
रेशनिंग वितरणात पारदर्शकता येईल
वन नेशन वन रेशन अभियानामुळे लाभार्थ्याला थेट लाभ मिळेल. त्यातून होणारा गैरप्रकारही थांबतील. प्रत्येकाने रेशन- आधार लिंक करून योजनेचा लाभ घ्यावा. अभियानामुळे रेशनिंग वितरणात पारदर्शकता येईल , काही तक्रार किंवा अडचण असल्यास 14445 वर संपर्क करा.
- जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर
जिल्ह्यातील स्थिती
सहा लाख 79 हजार 307 रेशन कार्ड
सहा लाख 64 हजार रेशन कार्डला आधार लिंक
15 हजार 330 कार्डला आधार लिंक नाही.
COMMENTS