अहमदनगर : भारत या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची अवहेलना अद्यापही संपलेली नाही. देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेती व्यवसायाशी...
अहमदनगर :
भारत या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची अवहेलना अद्यापही संपलेली नाही. देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेती व्यवसायाशी निगडित असते; परंतु हवामानातील बदल, निसर्गाचा अनियमितपणा, पर्जन्यमान, कीडरोग, सुधारित जातींची बियाणे उपलब्ध न होणे, शेती मालाच्या दरामध्ये घसरण होणे आदी कारणांमुळे शेती व्यवसायातून शाश्वतत उत्पन्न मिळेल, याची खात्री देता येत नाही. शेती व्यवसायातील असंख्य समस्यांवर विचारविनिमय करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने ग्राम कृषी विकास समिती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्थापन करण्याचा निर्णय सप्टेबर २०२० मध्ये घेतला आहे. हा शासन निर्णय होऊन जवळपास आठ महिने उलटले आहेत, तरीही ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी याबाबत कोणताही पुढाकार घेतलेला दिसून येत नाही.
गावकीचा कारभारी होण्यासाठी निवडणुकांमध्ये मोठी चढाओढ लागते. मात्र, शेतकऱ्यांना संजीवनी ठरणाऱ्या ‘या’ समिती स्थापनेबाबत सरपंच मंडळी पुरती उदासीन असल्याचे दिसून येते. ग्राम कृषी समिती स्थापना, तीचे कार्य, सदस्य निवड आदीबाबत गावामध्ये जनजागृती कार्यक्रम देखील घेण्यात आले नाहीत. असेच काहीसे चित्र राज्यभर दिसून येत आहे.
प्रगतशील आणि जागरूक शेतकरी यांनी आता पुढे येण्याची गरज असून स्थानिक पुढार्यांवर दबाव आणून ही समिती गठीत करण्याची आवश्यकता आहे. या समितीच्या माध्यमातून नेमक्या समस्या काय आहेत, त्या समस्येचे नेमेके समाधान काय आहे, याची योग्य माहिती शासनाकडे जाईल. त्यावरून सरकार स्तरावरून योग्य उपाययोजना केल्या जातील, असा या समिती स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. या मुख्य हेतूलाच सरपंचानी बगल दिली आहे.
समितीची आवश्यकता :
शेतकऱ्यांना गावामध्ये शेतीचा सर्वांगीण विकासासाठी, गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या विविध योजना व प्रकल्पामधून हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी, राज्य ग्रामपंचायत अधिनियमनुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये ग्रामकृषी विकास समिती स्थापन करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना गावातच कृषी विषयक योजनाची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी चौदा जणांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील काही ठराविक नागरिक पुन्हा-पुन्हा शासनाच्या योजनाचा लाभ घेतात. त्याला चाप बसणार आहे.
शेतकऱ्यांपर्यंत कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, कीड नियंत्रण, यांत्रिकीकरण, संरक्षण, शेती व फळबाग लागवडीविषयक माहिती शेतकऱ्यांना पोचवली जाणार आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम लागवड आदी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समितने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करून मार्गदर्शन शिबिरे, चर्चासत्रे आदींचे आयोजन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
पीक काढणी तंत्रज्ञान व बाजारपेठेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, शेतीसाठी आवश्य क कर्जपुरवठा करणाऱ्या बॅंका, सहकारी संस्था यांची माहिती तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या कृषीविषयक प्रासंगिक समस्थावर विचारविनिमय करून कृषी विभागाच्यावतीने संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. याबाबतची कार्यवाही समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. कृषी सहायकाच्या समन्वयाने ग्रामसेवकानी सभांचे आयोजन करावयाचे आहे. प्रत्येक महिन्यातून किमान एक सभा होणे आवश्याक आहे.
अशी असणार समितीची रचना :
ग्रामकृषी विकास समितीत 14 सदस्य असतील. यामध्ये सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. उपसरपंच पदसिद्ध सदस्य असतील. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सदस्य सचिव तर कृषी सहाय्यक सहसचिव असतील. शिवाय ग्रामपंचायत सदस्य, तीन प्रगतशील शेतकरी, त्यामध्ये एक महिला, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांचा एक प्रतिनिधी, महिला बचत गटाचा एक प्रतिनिधी, कृषी पूरक व्यवसायातील दोन शेतकरी आणि तलाठी अशा 14 प्रतिनिधींचा समावेश असेल. समितीची मुदत ग्रामपंचायतीच्या मुदती इतकीच असेल. नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर दीड महिन्यात ग्रामकृषी समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.
ही समिती केवळ कागदावर नको, योग्य अंमलबजावणी व्हावी : संदीप गेरंगे
शासनाने विविध समित्या स्थापन करून सर्वांगीण विकासात लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. अशा अनेक समित्या या कागदावरच राहिल्या आहेत. मात्र, कृषी व्यवसायाशी निगडीत आणि पर्यायाने ग्रामीण अर्थकारणाशी संबधित असणारी ही समिती कृतीशील असावी. इतर ग्राम स्तरीय समित्यांप्रमाणे कागदावर राहायला नको. या निर्णयाची योग्य अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांना निश्चित लाभ मिळेल, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते, प्रगतशील शेतकरी संदीप गेरंगे यांनी दिली आहे.
COMMENTS