एफआरपीनुसार उर्वरित ५६१ रुपयांप्रमाणे पेमेंट करावे; माजी उपाध्यक्ष केशव मगर व जिजाबापू शिंदे यांची मागणी प्रतिनिधी : शिवाजीराव नागवडे काराख...
एफआरपीनुसार उर्वरित ५६१ रुपयांप्रमाणे पेमेंट करावे; माजी उपाध्यक्ष केशव मगर व जिजाबापू शिंदे यांची मागणी
प्रतिनिधी :
शिवाजीराव नागवडे काराखान्याचे कामगार अध्यक्षांच्या स्वतःच्या खासगी कारखान्याची कामे करतात. अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यातील सत्तेचा गैरवापर करत असून सहकारी कारखाना मोडीत काढला आहे, असा आरोप नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर व जिजाबापू शिंदे यांनी केला आहे. काष्टी येथे बुधवारी सकाळी १० वाजता मगर व शिंदे या दोन्ही माजी उपाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने शेतकरी सभासदांना उर्वरित राहिलेले ५६१ रुपये एफआरपीप्रमाणे उसाचे पेमेंट द्यावे, अशी मागणी केशव मगर यांनी केली. यावेळी ते म्हणाले, कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. नागवडे कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे ५६१ रुपये ऊस बील काढले, तरच शेतकऱ्यांच्या अडचणी सुटतील. कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतूकदार यांचे १५ ते १६ कोटी रुपये देणे आहे, ते लवकरात लवकर द्यावे.
मगर व शिंदे म्हणाले, आठ वर्षांपूर्वी कोजनला परवानगी दिली होती. त्यानंतर २०१८-१९ साली प्रकल्प सुरू झाला. यामध्ये नियमाप्रमाणे प्रकल्प सुरू न झाल्याने कारखान्याचे १३ कोटींचे नुकसान होऊन शासनाकडे ठेवलेली अनामत रक्कम ८० लाख रुपये जप्त झाले. याला जबाबदार कोण, को-जनरेशन प्रकल्प सुरू करताना पर्यावरणाचे प्रमाणपत्र घेतले नसल्यामुळे कारखान्याला ७० लाख रुपये दंड झाला. कारखान्यात ठेकेदाराला व एस. एस. कंपनीला दिलेली कामे पूर्ण झाली नसताना त्याची पूर्ण बिले अदा केली. तीच कामे पुन्हा कामगाराकडून करून घेतली. यासाठी ३० लाखापर्यंत खर्च झाला. संचालक मंडळाने मिटिंगमध्ये कंपनीवर कार्यवाहीची मागणी केली, तर काराखाना अध्यक्ष यांनी अद्याप दखल घेतली नाही. पण ठेकेदाराची पाठराखण का केली. टर्बाईनसाठी शुद्ध पाण्याची गरज असताना स्कील न वापरल्यामुळे तेथे २५ ते ३० लाख खर्च वाढवला, ही जबाबदारी एस. एस. कंपनीची असताना गप्प बसण्याची भूमिका घेतली. पावरहाऊसला बांधकाम करताना उंची कमी देऊन निकृष्ट पत्रे बसवले. आज गळती चालू झाली आहे. एकेकाळी नफ्यात असणारा कारखाना नियोजनशून्य कारभारामुळे तोट्यात चालला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी
शिवाजीबापू यांचा कारभार चांगला होता. पण मुलगा राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात मनमानीपणा चालवला. सभासदांच्या उसाचे एफआरपीप्रमाणे दुसरे बील काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. कामगारांचे पगार व ऊसतोडणी वाहतूकदार यांची बिले लवकरात लवकर अदा करण्यात यावी, अशी मागणी करत माजी उपाध्यक्ष केशव मगर व जिजाबापू शिंदे याची अध्यक्ष राजेंद्र नागवडेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. शिवाजीबापू शेतकरी आणि कामगारांची पैसे कधी थकवत नव्हते, उलट अडचणीच्या काळात अनेकांना मदत केल्याच्या आठवणी केशव मगर व जिजाबापू शिंदे यांनी सांगितल्या.
COMMENTS