प्रतिनिधी : अहमदनगर नगर शहरामध्ये मनपा सत्ताधारी आणि विरोधक एक झाले आहेत. मनपात आता विरोधक असणारे भाजप मागील अडीच वर्ष राष्ट्रवादी बरोबर स...
नगर शहरामध्ये मनपा सत्ताधारी आणि विरोधक एक झाले आहेत. मनपात आता विरोधक असणारे भाजप मागील अडीच वर्ष राष्ट्रवादी बरोबर सत्तेत होते. त्यावेळी मनपातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असणाऱ्या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद न देता ते राष्ट्रवादीने स्वतःकडे ठेवले होते. राष्ट्रवादीने सत्ता बदलाच्या चर्चेत भाजपाला विरोधी पक्षनेते पदाचा शब्द दिला असून शहरातील सोयरे-धायरे आता विरोधी पक्षनेते पदाचे नाव निश्चित करणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत ही सोयऱ्या-धायऱ्याची नुरा कुस्ती सुरू आहे, असा आरोप शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
या विरोधात काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली असून करवाढीच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या वतीने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सदर तिप्पट करवाढ रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.
काँग्रेस सोडून तिप्पट करवाढी विरोधात कोणताही प्रमुख पक्ष भूमिका घेत पुढे आलेला नाही. काँग्रेस हाच नगरकरांच्या हक्कांसाठी लढणारा आणि त्यांच्या मनातला खरा विरोधी पक्ष आहे. सामान्य नगरकरांचे करवाढ करून कंबरडे मोडले जात असताना शहराच्या आमदारांनी मात्र मूग गिळून गप्प बसणे पसंत केले आहे, अशी टीका जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली असून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यां बरोबर असला तरी काँग्रेस मात्र सर्वसामान्य नागरिक आणि नगरकरांबरोबर असल्याचे काँग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नगरकरांना खड्ड्यात घालणाऱ्यांना वाढीव कर का द्यावा...
कर संकलन करून त्या माध्यमातून शहरातील नागरिकांना नागरी मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी ही मनपाची आहे. इतर नागरि सुविधा तर जाऊ द्या पण साधे रस्ते सुद्धा करू न शकणाऱ्या आणि नगरकरांना खड्ड्यात घालणाऱ्यांना वाढीव कर का द्यायचा, असा परखड सवाल काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या बैठका घेणार
मनपाने तिप्पट करवाढीचा प्रस्ताव रद्द न केल्यास काँग्रेसच्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये नागरिकांच्या बैठका घेऊन करवाढीला विरोध केला जाईल. मनपाच्या या तुघलकी निर्णयाविरोधात नागरिक, व्यापारी, उद्योजक यांच्यामध्ये जनजागृती केली जाईल. तसेच या बैठकांच्या माध्यमातून शहरातील एक लाख नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबविली जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
COMMENTS