स्वयंभूच्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आर्किटेक्चर अर्षद शेख, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे सूक्ष्म जीवश...
प्रतिनिधी : अहमदनगर
स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा चौथा वर्धापनदिनी रविवारी (दि. १२ सप्टेंबर) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित वक्त्यांनी विविध सामाजिक मुद्यांवर चौफेर फटकेबाजी करत श्रोत्यांना जणू वैचारिक मेजवानीच दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संस्थापक पांडुरंग काळे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आर्किटेक्चर अर्षद शेख, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे सूक्ष्म जीवशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. गिरीश कुकरेजा, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक दौलतराव जाधव, सारथी संस्थेचे अक्षय बोंबले आदी मान्यवर उपस्थित होते.
अक्षय बोंबले यांनी विचारातून आचरणाकडे याविषयावर मांडणी करतांना, राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत होणाऱ्या उपक्रम आणि शिबिरांमुळे असंख्य सामाजिक कार्यकर्ते उभे राहिले आहेत. समाजात विविध प्रश्न आणि समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. तरुणांमध्ये संवेदना असतील, त्यांची जाणीव निर्माण होते, त्यातूनच सामाजिक चळवळ उभी राहते.
प्रा. गिरीश कुकरेजा यांनी सध्याच्या शैक्षणिक धोरण आणि परिस्थितीवर भाष्य करताना आपल्या खुमासदार शैलीत व्यवस्थेचे वाभाडे काढले. शिक्षण हे नोकरी देणारी हमी योजना नसून शिक्षणातून समृद्ध माणूस घडला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करतांनाचा आपल्या प्रथा आणि परंपरामुळे सामाजिक रचनाच बिघडली असल्याचे सांगितले. ही बिघडलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी शिक्षण पद्धती आणि धोरणात अमुलाग्र बदल करणे अपरिहार्य आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आर्किटेक्चर अर्षद शेख यांनी युवकांना परदेशातील नोकरीतील संधी समजावून सांगितल्या. परदेशातील अनुभव कथन करतांना ते म्हणाले की, ‘आपल्या देशात ज्याप्रमाणे वशिलेबाजी, धर्म आणि जातीला प्राधान्य दिले जाते. तसे वातावरण परदेशात नाहीत. ते ‘कौशल्य’ आणि क्षमता तपासून नोकरी देतात. परदेशात मनुष्य बळाची कमतरता असल्याने भारतीय तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी आहेत, त्याचा लाभ तरुणांनी घेतला पाहिजे’. ‘रक्त’ तयार करण्याचा कोणताही कारखाना अस्तित्वात नाही. पण स्वयंभूने रक्तदानाची चळवळ ग्रामीण भागात पोहचवली. ‘रक्त’ हा मानवतेचा संदेश देणारे प्रतिक आहे. ज्यावेळी रुग्णाला रक्ताची गरज पडते, त्यावेळी त्या रक्ताचा दाता कोणत्या जातीचा आहे हे शोधले जात नाही. रक्तामुळे रुग्णाला जीवनदान मिळते, त्यामुळे ‘स्वयंभू’चे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अर्षद शेख यांनी काढले.
कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी राजकारणाचे वाढते गुन्हेगारीकरणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, सुसंस्कृत आणि शिक्षित पिढी राजकारणात येणे गरजेचे आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी राजसत्ता मिळवली असल्याने सामाजिक अशांतता पसरत आहे. त्यातून अनेक गंभीर समस्या उद्भवत आहेत.
कोपरगाव ग्रामीणचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी स्वयंभूच्या उपक्रमाला शुभेच्छा देतानाच ‘ तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.’
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी स्वयंभूच्या वाटचालीबद्दल माहिती सांगितली. यापुढील काळात स्वयंभूकडून अपेक्षा वाढल्या आहेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात विविध समस्या आणि प्रश्नांवर दिलखुलासपणे चर्चा झाली. विचारमंथनपर कार्यक्रमामुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमप्रसंगी पत्रकार महादेव गवळी, विनोदकुमार सूर्यवंशी, ग्राफिक्स डिझाईनर विशाल विधाटे, आदींचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वयक प्रा. भारती दानवे, भारुडकार अनिल केंगार, ह. भ. प. सिद्धीनाथ मेटे महाराज, निवेदक उद्धव काळापहाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली भोसले यांनी केले. तर पांडुरंग काळे यांनी अध्यक्षीय भाषण करतांना आभार मानले.
COMMENTS